नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात नवनवीन घडामोडी सुरु आहेत. सर्वांचे लक्ष लागून असलेल्या शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर नुकताच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल जाहीर केलाय. त्यानंतर ठाकरे गट त्यांच्या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात गेलं आहे. याबाबत आताची सर्वात मोठी बातमी आहे.
शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. सुप्रीम कोर्टाने आज ठाकरे गटाच्या वकिलांची बाजू ऐकून घेतली. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या सर्व 40 आमदारांना नोटीस जारी केली. सुप्रीम कोर्टाने सर्व आमदारांना आपलं म्हणणं सादर करण्याची नोटीस जारी केली असून शिंदे गटाच्या आमदारांना दोन आठवड्यांची मुदत दिली आहे. सुप्रीम कोर्ट त्यांची बाजू ऐकून घेणार आहे. त्यानंतर हे प्रकरण हायकोर्टात पाठवावे किंवा हायकोर्टातील प्रकरण सुप्रीम कोर्टात घ्यावे यावर निर्णय होईल. सुप्रीम कोर्टात या प्रकरणातील पुढची सुनावणी 15 दिवसांनी होईल. मात्र तारीख अद्याप सांगण्यात आली नाहीय.
सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष
विधानसभा अध्यक्षांनी जाहीर केलेल्या निकालाच्या विरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. तर शिंदे गटाने देखील मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र करावं, अशा मागणीसाठी शिंदे गटाने हायकोर्टात धाव घेतली आहे. दुसरीकडे ठाकरे गटाने याबाबतचा निकाल घ्यावा, या मागणीसाठी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. याप्रकरणी सुप्रीम कोर्ट नेमकं काय निकाल देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.