नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून (Shivsena) बंडखोरी करत सत्ता स्थापन केली. शिंदे गटाकडे संख्याबळ जास्त असल्याने शिंदे गटाने शिवसेनेसह धनुष्यबाण चिन्हावर दावा केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या गटाने आता थेट निवडणूक आयोगाकडे (election commission) धाव घेतली आहे.
आमच्या गटाला शिवसेना (Shiv Sena) म्हणून मान्यता द्या, अशी मागणी शिंदे गटाने केली आहे. तसे पत्रच या गटाने निवडणूक आयोगाला दिलं आहे. आमच्याकडे दोन तृतियांश संख्याबळ आहे. 50 आमदार आणि 12 खासदारही आमच्याकडेच आहेत. त्यामुळे आमच्या गटालाच शिवसेना म्हणून मान्यता देण्यात यावी, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.
शिंदे गटाच्या या पत्राआधीच शिवसेनेनेही निवडणूक आयोगाला एक पत्रं दिलेलं आहे. शिंदे गटाकडून कोणताही दावा केला गेल्यास आमचं म्हणणं ऐकल्याशिवाय निर्णय देऊ नये, अशी विनंती शिवसेनेने निवडणूक आयोगाला केली होती. त्यात आता शिंदे गटाकडून दाव्याचं पत्रं आल्याने निवडणूक आयोग काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाने केलेल्या या दाव्यामुळे शिवसेनेची चांगलीच कोंडी झाली आहे.