जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्यात मोठा सत्तासंघर्ष (Maharashtra Political Crisis) झाल्यानंतर शिंदे- फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Govt) आलं. दरम्यान अनेक दिवसांनी मंत्रिमंडळ विस्तार झाला. यात काही आमदारांना मंत्रीपदे देण्यात आली. काहींना जुनीच खाती दिली तर काहींना नवीन खाती देण्यात आली आहेत. नंतर पालकमंत्रीही जाहीर करण्यात आले आहेत. या मंत्रिपदावरून अनेक बडे नेते नाराज असल्याचं दिसून आलं. शिंदे गटातील (Shinde Group) ही धुसफूस अजूनही सुरूच आहे.
दरम्यान शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Minister Gulabrao Patil) यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. जळगाव जिल्ह्यातील फुलगाव येथे पाणीपुरवठा योजनेच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.
चांगलं मंत्रिपद मिळालं असतं
ते म्हणाले की, चांगल्या खात्याचा थोडा आग्रह धरला असता तर चांगलं मंत्रिपद मिळालं असतं, पण जे चाललंय ते चालू द्या, पाटलांच्या या विधानाचे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत. तसेच आपल्या गावात सुरू केलेल्या योजनेवरूनही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पुढच्या वेळेस गाव मला मतदान करणार की नाही? असा संशय त्यांनी व्यक्त केला. गावात पाण्यासाठी डायरेक्ट मिटर बसवल्याचेही त्यांनी गावकऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.
जन्माला बाळ आम्ही घालायचं
तसेच यावेळी गुलाबराव पाटलांनी विरोधकांवरही निशाणा साधला. काही लोक आमच्यात मध्ये मध्ये करतात. ज्यांना ठराव माहिती नसतो ते सुद्धा आम्ही योजना मंजूर करून आणली असे सांगतात. मात्र जन्माला बाळ आम्ही घालायचं आणि बारसं तुम्ही करायचं हा यांचा धंदा असल्याचेही गुलाबराव पाटील म्हणाले.