मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
सुषमा अंधारे अधिक सक्रिय झाल्यामुळं ठाकरे गटातील दिपाली सय्यद शिंदे गटाच्या मार्गावर असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. म्हणून आता पुन्हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवली जात आहे. यावर आता सुषमा अंधारेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
मी शिवसेनेत नवीन आहे. त्यामुळं स्वत:ला सिद्ध करतेय. राजकारणात कोण कधी, कुठं जाईल सांगता येत नाही. मी अंतर्गत स्पर्धक नाही तर स्वत:ला सिद्ध करतेय. आता दिपाली सय्यद काय करतात तेही दिसेलच, असं सुषमा अंधारे म्हणाल्या. मनसेच्या शालिनी ठाकरेंनीही अंधारेंवरुन पेडणेकर आणि मनिषा कायंदेंना ट्विटरवरुन चिमटा काढला. यावरुनच सय्यद ठाकरे गट सोडून शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा सुरु झाली आहे.
अंधारात तीर मारणाऱ्या नवं शिवसैनिकांमुळे माजी महापौर व कांदे बाई यांचे वांदे झाल्याची चर्चा शिल्लक सेनेत सुरू आहे. महाप्रबोधन यात्रेत बोलावले नाही म्हणून त्यांनी प्रमुखांकडे तक्रार करुनही उपयोग झाला नाही. मूळ सैनिक यांच्यावर अन्याय करुन उपऱ्याना संधी ही नवीन शिल्लक सेना, अजब आहे
2019च्या विधानसभा निवडणुकीआधी दिपाली सय्यद शिवसेनेत आल्या होत्या. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी त्यांना मुंब्र्यातून जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात उमेदवारी दिली होती. पण आता त्या शिंदे गटात जाणार की काय ? अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.
विशेष म्हणजे शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्यांनी आधी ठाकरे आणि शिंदेंना एकत्र आणण्याचाही प्रयत्न केला. नंतर शिंदेंची भेट घेऊन त्यांच्याच कामाचं कौतुकही केलं.
तर, शिवसेनेत फूट पडल्यानंतरच, सुषमा अंधारेंची एंट्री झाली आणि सध्या त्या ठाकरे गटासह भाजपवर अक्षरश: तुटून पडतायत. ठाकरे गटाच्या महाप्रबोधन यात्रेतही अंधारेच दिसत आहेत.