क्रूरतेचा कळस; १५ वर्षीय मुलीवर सामुहिक अत्याचार करून कोळसा भट्टीत जिवंत जाळलं…

0

 

राजस्थान, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

मणिपूर प्रकरण सुरु असतांना राजस्थान मधून क्रूरतेचा कळस गाठणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. अनेक दिवसांपासून बेपत्ता असलेल्या अल्पवयीन मुलीची चप्पल आणि हातातलं कडं कोळसा भट्टीच्या बाहेर सापडल्याने खळबळ उडाली आहे. आरोपींनी अल्पवयीन मुलीवर सामुहिक अत्याचार करुन तिची अमानुषपणे निर्घृण हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह जंगलातील कोळसा भट्टीत टाकून जाळून टाकला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस, फॉरेंसिक टीम आणि डॉग स्क्वॉड घटनास्थळी दाखल झालं असून तपास सुरु करण्यात आला आहे. राजस्थानमधल्या भीलवाडा इथे ही दुर्देवी घटना घडली आहे. याप्रकरणी संशयावरुन चार जणांना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरु आहे.

या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भीलवाडामधल्या कोटडी भागातील नरसिंहपुरा गावात राहाणारी १५ वर्षीय मुलगी बुधवारी सकाळी आपल्या आईसह जंगलात बकऱ्या चारण्यासाठी गेली होती. दुपारी जेवण बनवण्यासाठी मुलीची आई घरी परतली. पण संध्याकाळी उशीरापर्यंत मुलगी घरी न परतल्याने तिच्या कुटुंबियांनी आणि गावातील लोकांनी मुलीचा शोध सुरु केला. पण ती कुठेच सापडली नाही.

मुलीचा शोध सुरु असताना गावातील काही लोकांना जंगलातील कोळसा भट्टी पेटत असलेली दिसली. जवळ जाऊन पाहिल्यावर भट्टीबाहेर मुलीच्या हातातलं कडं आणि तिची चप्पल आढळली. कालबेलिया समाजाने जंगलात चार-पाच भट्ट्या बनवल्या असून जंगलातील लाकूड तोडून ते या भट्ट्यांमध्ये टाकतात. यातली एकच भट्टी पेटत होती.

संशय आल्याने गावकऱ्यांनी भट्टीतली लाकडं बाहेर काढली असता त्यांना धक्का बसला. भट्टीत काही हाडं सापडली. या घटनेने गावात तणावाचं वातावरण आहे. कायदा सुव्यवस्था राखण्यात पोलीस अपयशी पडत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. 15 वर्षांच्या मुलीवर अत्याचार करुन तिला कोळसा भट्टीत जिवंत जाळण्यात आलं. भीववाडात घडलेली ही घटना देशाला हादरवणारी आहे, दरम्यान याप्रकरणात पोलिसांनी तपास सुरु केला असून चार जणांना ताब्यात घेतलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.