अजूनही वेळ गेलेली नाही.. उद्धव ठाकरेंचं बंडखोरांना भावनिक आवाहन

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

एकनाथ शिंदे गटाने बंड पुकारल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. तर बंड पुकारलेल्या आमदारांमुळे महाविकास आघाडीचे सरकार धोक्यात आले आहे. सरकार पडते की काय अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.

तर दुसरीकडे एकनाथ शिंदे व बंड करणारे आमदार गुवाहाटीतूनच चर्चा करीत आहे. ते अद्याप मुंबईत परतलेले नाही. ते केव्हा येतील याची सर्वजण वाट पाहत आहेत. अशात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांनी बंडखोर आमदारांना शेवटचे आवाहन केले आहे.

आपण गेल्या काही दिवसांपासून गुवाहाटी येथे अडकून पडलेले आहात. आपल्याबाबत रोज नवीन माहिती समोर येत आहे. आपल्यातील बरेच संपर्कातही आहेत. आपण आजही मनाने शिवसेनेत आहात. आपल्यापैकी काही आमदारांच्या कुटुंबातील सदस्यांनी देखील संपर्क साधून आपल्या मनातील भावना मला कळवल्या आहेत, असे उद्धव ठाकरे आमदारांना म्हणाले.

आपल्या भावनांचा मी शिवसेनेचा कुटुंबप्रमुख म्हणून आदर करतो. कुटुंबप्रमुख म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो अजूनही वेळ गेलेली नाही. माझं आपल्याला सगळ्यांना आवाहन आहे, आपण या माझ्या समोर बसा, शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर करा. यातून निश्चित मार्ग निघेल. आपण एकत्र बसून यातून मार्ग काढू, असेही आवाहन करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

कोणाच्याही कोणत्याही भूल थापांना बळी पडू नका. शिवसेनेने जो मानसन्मान तुम्हाला दिला तो कुठेही मिळू शकत नाही. समोर आलात, बोललात तर मार्ग निघेल. शिवसेना पक्ष प्रमुख आणि कुटुंब प्रमुख म्हणून आजही मला तुमची काळजी वाटत आहे. समोर येऊन बोला आपण मार्ग काढू, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.