झारखंड, लोकशाही न्यूज नेटवर्क;
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आणि त्यांना आदिवासींचे जल, जंगल आणि जमीन उद्योगपतींच्या ताब्यात द्यायची आहे, असा आरोप केला. झारखंडमधील चाईबासा येथे निवडणूक रॅलीला संबोधित करताना गांधींनी सत्तेवर आल्यास करोडो लोकांना करोडपती बनवण्याचे आश्वासन दिले.
राहुल गांधींनी संबोधनाच्या सुरुवातीला जोहर हा शब्द वापरला होता. जोहरचा अर्थ आहे – निसर्गाचा गौरव जो सर्वांचे कल्याण करतो. राहुल म्हणाले, नरेंद्र मोदींनी 22 अब्जाधीश केले. आता काँग्रेस लखपती निर्माण करेल. सत्तेत आल्यानंतर काँग्रेस प्रथम गरीब कुटुंबांची यादी तयार करणार आहे. ते म्हणाले की, ही लोकसभा निवडणूक संविधान आणि आदिवासी, गरीब, मागासलेल्या लोकांचे हक्क वाचवण्यासाठी आहे. गांधी म्हणाले की, इंडिया आघाडीचे नेते संविधान वाचवण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देण्यास तयार आहेत.
‘पंतप्रधानांना जल, जंगल आणि जमीन उद्योगपतींना द्यायची आहे’
माजी काँग्रेस अध्यक्ष म्हणाले, “पंतप्रधानांना आदिवासींचे ‘जल, जंगल, जमीन’ 14-15 उद्योगपतींच्या हाती सोपवायचे आहे… त्यांनी आपल्या 10 वर्षांच्या कार्यकाळात 22 लोकांना अब्जाधीश केले… आम्ही करोडो लखपती निर्माण करू आणि गरीब महिलांना वर्षाला एक लाख रुपये देऊ. बेरोजगार डिप्लोमाधारक आणि पदवीधरांना एक वर्षाचे प्रशिक्षण देण्याचे आश्वासनही गांधींनी दिले.
संविधानाचे पुस्तक दाखवत ते म्हणाले – भाजपला ते फाडायचे आहे
या सभेत राहुल गांधी यांनी संविधानाचे पुस्तक दाखवत हा देशाचा आवाज असल्याचे सांगितले. भाजपवाल्यांना ते फाडून फेकायचे आहे. तुम्हाला जे काही मिळाले आहे, ते या पुस्तकाने दिले आहे. तुम्हाला संविधानातूनच आरक्षण मिळते. राज्यघटनेतून तुम्हाला नोकऱ्या मिळतात, राज्यघटनेतून शिक्षण मिळते. हे नाहीसे झाल्यास आदिवासी कोठेही उरणार नाही. सर्व काही 10 ते 15 अब्जाधीशांच्या हातात जाईल. संविधानाच्या रक्षणासाठी प्राणाची आहुती देण्यास आम्ही तयार आहोत. आदिवासी हा देशातील जमिनीचा पहिला मालक आहे.