मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
सद्य परिस्थितीत राज्य सरकार मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा करत आहे तर दुसरीकडे विरोधी पक्षाकडून टीका करण्यात येत असून राजकीय वर्तुळात सध्या ट्विट वॉर सुरु झाल्याचे बघावयास मिळत आहे. दरम्यान शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यघटनेचा हवाला देत हे राज्य सरकारच बेकायदेशीर असल्याचे सांगत दोन मंत्र्यांवर सरकार चालवता येत नाही. त्यासाठी १२ मंत्र्यांची गरज लागते, असे ट्वीट केले होते.
संजय राऊतांच्या ट्विटला भाजप नेते आशिष शेलार यांनी “त्यांच्या काळात किती मंत्री होते हे त्यांना आठवत नसेल, तर त्यांनी घरी जाऊन गजनी सिनेमा बघावा”, असे जोरदार प्रत्युत्तर दिले. संजय राऊत हे फिल्म निर्माते असल्याच्या कारणास्तव त्यांनी गजनी सिनेमा आवर्जून बघावा. तसेच जेव्हा राज्यात महाविकास आघाडीचे राज्य होते त्यावेळी ३२ दिवस किती मंत्री होते याचं उत्तर त्यांनी द्यावं, याचा अर्थ त्यांचे सरकारही अनाधिकृत होतं का? असा सवालही शेलारांनी उपस्थित केला.