’50 खोके एकदम ओक्के’, विरोधकांची जोरदार घोषणाबाजी (व्हिडीओ)

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

आजपासून विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन (Maharashtra Monsoon Assembly Session) सुरु झाले असून अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक (Opposition) चांगलेच आक्रमक झालेले दिसून आले.

महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) नेत्यांनी एकत्र येऊन विधीमंडळाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केलं. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी विरोधकांनी केली. तसंच यावेळी शिंदे-फडणवीस सरकारच्या (Shinde-Fadnavis government) विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

महाविकास आघाडीतील नेत्यांनी यावेळी शिंदे गटातील आमदारांना चांगलेच घेरलं. सभागृहात जाण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि शिंदे गटातील आमदार जवळ येताच ’50 खोके, एकदम ओक्के’, ‘आले रे आले गद्दार आले’, अशा घोषणा विरोधकांनी दिल्या.

‘आशिष शेलार (Aashish Shelar) यांना पुन्हा मुंबई अध्यक्ष करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो,’ धनंजय मुंडेंच्या (Dhananjay Munde) घोषणांनी लक्ष वेधून घेतलं. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांच्या घोषणांनी लक्ष वेधून घेतलं. ईडी सरकार हाय हाय, शेतकऱ्याला मदत न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, संजय शिरसाट यांना मंत्रिपद न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, सुधीरभाऊंना चांगलं खातं न देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, ओला दुष्काळ जाहीर न करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, आशिष शेलार यांना मंत्री न करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो. आशिष शेलार यांना पुन्हा मुंबई अध्यक्ष करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो. अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

तसेच  शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आणि त्यानंतर भाजप नेत्यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं. “या परिस्थिती शेतकरी, महिला यांच्या आवाजाचा कोणीच विचार करत नाही. स्वत:ला काय मिळालं, मिळालं नाही याचा विचार करत आहेत. या सरकारमध्ये अपक्षांना स्थान नाही, महिलांना स्थान नाही आणि मुंबईकरांना स्थान नाही. आम्ही लोकशाहीचा खून करणाऱ्यांच्याविरोधात उभे आहोत. हे गद्दार सरकार आहे, ते कोसळणार म्हणजे कोसळणारच,” अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

आदित्य ठाकरे यांच्या टीकेला भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी उत्तर दिलं. “आदित्य ठाकरेंची भाषा अशोभनीय आहे. बेईमानी आणि लाचारी या शब्दांचा अर्थ समजायचा असेल तर मतं घ्यायची मोदीजींचा फोटो दाखवून आणि गोदीत जाऊन बसायचं सोनिया गांधी यांच्या, हे बेईमानी नाही का? लाचार या शब्दाचा अर्थ घ्यायचा असेल तर मदत देवेंद्र फडणवीस यांच्याकडून घ्यायची आणि सत्तेची गोड फळं चाखण्यासाठी शरद पवारांच्या गोदीत बसायचं, याचा लाचारी म्हणत नाही का? आदित्यजी जरा अभ्यास करा, अभ्यास करण्यासाठी तुमच्याकडे वय आहे आणि मगच भाष्य करा,” असं आशिष शेलार म्हणाले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.