आणखी सहा घोटाळे उघडणार; सोमय्यांचा आता थेट निशाणा आदित्य ठाकरेंवर..

1

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये सध्या चांगलेच जुंपले आहे. तसेच महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांसह त्यांचे आप्तेष्ट ईडी आणि आयकर विभागाच्या रडारवर आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांची संपत्ती ईडीने काल जप्त केली. तर हिरानंदानी समूहाच्या मुंबई, बंगळुरू व चेन्नईसह २४ ठिकाणी आयकर विभागाने छापे टाकले.

सोमय्यांच्या निशाण्यावर आदित्य ठाकरे

त्यातच महाविकास आघाडी सरकारवर सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप करणारे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या निशाण्यावर आता युवासेना प्रमुख आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आले आहेत. किरीट सोमय्या यांनी ईडीने केलेल्या कारवाईच्या अनुषंगाने थेट ठाकरे कुटुंबावर हल्लाबोल केला आहे. सगळी प्रकरणे समोर आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची रात्रीची झोप उडणार असल्याचेही किरीट सोमय्या यांनी म्हटले.

मुख्यमंत्र्यांनी कोणतेही भाष्य केले नाही

दरम्यान ईडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या मालकीची सुमारे 6 कोटींची मालमत्ता जप्त केली. ईडीने मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांवर कारवाईने केल्याने मोठी खळबळ उडाली होती. किरीट सोमय्या यांनी आज पत्रकार परिषदेत ठाकरे कुटुंबावर आरोप करताना म्हटले की, ठाकरे कुटुंबीय आणि अन्वय नाईक यांच्या जमिनी व्यवहाराबाबत माहिती दिली होती. त्याबाबत मुख्यमंत्र्यांनी कोणतेही भाष्य केले नाही. आता ईडीच्या कारवाईबाबत तरी बोलतील का, असाही प्रश्न त्यांनी केला.

देशातील मोठा हवाला किंग

तसेच सोमय्या म्हणाले की, आदित्यने 2014 मध्ये आई रश्मी ठाकरे सोबत कोमो स्टॉक अँड प्रॉपर्टीज ही कंपनी स्थापन केली. त्यानंतर पाच वर्षानंतर आदित्य यांनी कंपनीच्या संचालकपदाचा राजीनामा दिला. आता ही कंपनी देशातील मोठा हवाला किंग नंदकिशोर चतुर्वेदीच्या मालकीची झाली आहे. उद्धव यांनी याबाबत काहीही भाष्य केले नाही. आदित्य श्रीधर आणि रश्मी यांच्यात कौटुंबिक संबंधासोबत आर्थिक संबंध आहेत का हे त्यांनी स्पष्ट करावे अशीही मागणी सोमय्या यांनी केली. शेल कंपन्याच्या माध्यमातून मोठा आर्थिक व्यवहार झाला असल्याचाही आरोप सोमय्या यांनी केला. नंदकिशोर चतुर्वेदी आणि ठाकरे कुटुंबाचा संबंध काय हे मुख्यमंत्र्यांनी सांगावे, मनी लाँड्रिंग केली आहे का, या प्रश्नांची उत्तरे मुख्यमंत्री ठाकरे यांनी देण्याची मागणी सोमय्या यांनी केली.

सहा घोटाळे उघड करणार

येत्या काही दिवसांत आणखी सहा छोटे मोठे घोटाळे बाहेर येणार असून तपास यंत्रणांची कारवाई होणार असल्याचे वक्तव्य किरीट सोमय्या यांनी केले. एवढा पैसा कुठून आला, महापालिकेच्या कंत्राटदारांकडून आले की दोन वर्षाच्या सरकारच्या कार्यकाळात झालेल्या घोटाळ्यातून पैसे जमा झाले याचे उत्तर मुख्यमंत्री उद्धव यांनी देण्याची मागणीदेखील त्यांनी केली.

 

1 Comment
  1. Dharmendra Badgujar sir says

    फडणविसाच्या काळात २२ मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले त्यांचीही चौकशी करा .. बळी तो कान पिळी असा प्रकार सुरु आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.