जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेला आणि राज्याचा राजकारणाचा महानिकाल बुधवारी शिंदे गटाकडून लागला. या निकालावर प्रचंड टीका देखील करण्यात आली. आमदार अपत्राता प्रकरणी निकाल लागल्यानंतर मंत्री गुलाबराव पाटील यांचे जळगाव येथे आगमन झाले यावेळी रेल्वे स्थानकावर त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
ते काय पक्ष चालवणार
मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, आम्हाला गद्दार म्हटलं गेलं असलं तरी आम्ही कोणतीही गद्दारी केली नाही. पक्षाचे विचार आम्ही सोडले नाहीत, पक्ष वाचवण्यासाठी आम्ही वेगळे झालो, बहुमताच्या आधारावर आमच्या बाजूने हा निकाल लागला. उद्धव ठाकरे यांनी संजय राऊतसारखे भूत आवरावे हाच आपला उध्दव ठाकरे यांना सल्ला असल्याची प्रतिक्रिया पाटील यांनी दिली आहे. घटना सुद्धा ज्यांना माहीत नाही ते काय पक्ष चालवणार, ज्यांनी आमच्यावर आरोप केले त्यांना ही मोठी चपराक आहे.
खडसेंना अधिकार नाही
तसेच एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादी पक्षाबाबत बोलण्याचा त्यांना कोणताच अधिकार नाही. राष्ट्रवादी पक्षाने त्यांना भरपूर दिले आहे, राष्ट्रवादी फुटणार नाही याची काळजी घ्यावी आणि राष्ट्रवादीबाबत चांगला विचार करावा. शिवसेनेनं जो पवित्रा घेतला आहे तोच पवित्रा अजित पवार यांनी घेतला आहे. हा निकाल अन्यायकारक नाही, ज्या चाळीस लोकांनी पक्ष वाढविण्यासाठी तुम्हाला सावध केले होते. तुम्ही त्याला महत्व दिले नाही उलट त्यांनी या बाबत विचार करायला हवा होता मात्र त्यांनी तो केला नाही. त्यामुळे ते जनतेत जरी फिरले तरी आम्ही गद्दारी केली असे जनता त्यांना म्हणणार नाही. त्यांनी गद्दारी केली नाही तर पक्ष वाचवला आहे, असे पाटील म्हणाले.