नांदेड, लोकशाही न्यूज नेटवर्क
लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राज्यात प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली आहे. यामध्ये राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. मात्र, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यात वाद ओढवून घेण्यात आघाडीवर आहेत. विरोधी पक्षच नव्हे तर मित्रपक्षांतील नेत्यांवरही ते टीका करत सुटले आहेत. त्यामुळे सर्व स्तरांतून त्यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यातच त्यांनी मंत्री गिरीश महाजनांवर केलेल्या टीकेला आता महाजनांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.
गिरीश महाजन म्हणाले, ‘संजय राऊत बोलत होते याची लायकी काय? म्हणून मी म्हटले अरे वेड्या, आम्ही सात-सात वेळा एकाच मतदार संघातून निवडून येतो. तुम्ही आयते राज्यसभेवर जाता आणि आम्हाला लायकी शिकवता का? तुम्ही फक्त एकदा उभे राहा, महाराष्ट्रातला कुठलाही सेफ मतदारसंघ तुम्ही काढा. तेथे उभे राहा निवडून येऊन दाखवा. घरातून उठले की सकाळी कोंबड्या सारखी बांग देत बसतात’, अशी बोचरी टीका गिरीश महाजन यांनी केली. ‘एकदा निवडणूक लढव बाबा आमदारकी, खासदारकीची. निवडणूक लढवून दाखव मग आम्हाला सांग आमची लायकी काय आहे’, असं खुलं आव्हान गिरीश महाजन यांनी दिले. नांदेड येथील प्रचारसभेत बोलताना महाजनांनी राऊतांवर टीकास्त्र उपसले.