दक्षिण मुंबई, ठाणे, नाशिकचे अजूनही ठरत नाही !

महायुतीचा प्रचार खोळंबला : कार्यकर्ते संभ्रमात

0

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क 

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असताना महायुतीकडून दक्षिण मुंबई, ठाणे आणि नाशिकसह पाच लोकसभा मतदारसंघात अद्याप अधिकृत उमेदवाराची घोषणा न झाल्याने येथील निवडणूक प्रचार खोळंबला आहे. उमेदवारांच्या नावाची घोषणा नेमकी कधी होणार आणि प्रचार कधी करणार, असा प्रश्न महायुतीच्या कार्यकर्त्यांना पडला आहे. महाविकास आघाडीने उमेदवार जाहीर करून प्रचारात आघाडी घेतली आहे, तर महायुतीच्या कार्यकर्त्यांना अजून उमेदवाराची प्रतीक्षा आहे.

अठराव्या लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात महाराष्ट्रात नाशिक, धुळे, दिंडोरी, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, उत्तर-मुंबई, उत्तर-पश्चिम मुंबई, उत्तर-पूर्व मुंबई, उत्तर-मध्य मुंबई, दक्षिण-मध्य मुंबई आणि दक्षिण-मुंबई अशा 13 मतदारसंघांत येत्या दि. 20 मे रोजी मतदान होत आहे. पाचव्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत येत्या तीन मे रोजी संपत आहे. तत्पूर्वी उमेदवार घोषित करून महायुतीला प्रचाराची गती वाढवावी लागणार आहे.

महायुतीत भाजप आणि शिवसेना यांच्यात नाशिक, पालघर, ठाणे या तीन जागांवरून रस्सीखेच सुरू आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात डॉ. श्रीकांत शिंदे हे महायुतीचे उमेदवार असतील, अशी घोषणा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यामुळे कल्याणबाबतचा संभ्रम दूर झाला आहे. उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिवसेनेला अजून उमेदवार मिळालेला नाही. यामुळे या मतदारसंघात महायुतीच्या प्रचाराचा ठावठिकाणा नाही. याउलट महाविकास आघाडीने आपले उमेदवार घोषित करून प्रचाराला सुरुवात केली आहे.

गेल्या तीन आठवड्यांपासून महायुतीत नाशिकच्या जागेचा तिढा सुटलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या माघारीनंतरही महायुतीत नाशिकच्या जागेचे भिजत घोंगडे आहे. नाशिकचे शिवसेनेचे संभाव्य उमेदवार हेमंत गोडसे आणि अजय बोरस्ते यांनी ठाण्यात अनेक चकरा मारल्या, तरीही येथील उमेदवारी गुलदस्त्यात आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने येथील उमेदवार घोषित करून महिना उलटला असून, राजाभाऊ वाजे यांनी प्रचाराच्या अनेक फेऱ्या पूर्ण केल्या आहेत. पालघरमध्ये मावळते खासदार राजेंद्र गावित महायुतीचे उमेदवार असतील; परंतु, ते भाजपकडून लढणार की शिवसेनेकडून हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. राजेंद्र गावित सध्या शिवसेनेत आहेत.

ठाणे कुणाचे?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या ठाणे लोकसभा मतदारसंघाबाबतही भाजप आणि शिवसेनेत निर्णय होताना दिसत नाही. ठाण्याची जागा शिवसेनेला सुटल्याची चर्चा असून, येथून नरेश म्हस्के यांचे नावे आघाडीवर आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने ठाण्यातून राजन विचारे यांना उमेदवारी दिली आहे.

शिवसेना उमेदवाराच्या शोधात
उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांनी निवडणूक लढविण्यास नकार दिल्याने उमेदवारी कुणाला द्यायची, असा प्रश्न मुख्यमंत्री शिंदे यांच्यासमोर आहे. उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघात उद्धव ठाकरे गटाने अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी दिली आहे. दक्षिण मुंबई लोकसभा जागेवर सुरुवातीला भाजप आणि शिवसेना अशा दोघांनी दावा केला होता. भाजपने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांना निवडणूक तयारीच्या सूचना केल्या आहेत. मात्र, शिवसेना ही जागा सोडण्यास तयार नसल्याने अखेर त्यांना ही जागा देण्यात आल्याचे समजते. मात्र, अद्याप येथून शिवसेनेला उमेदवार मिळालेला दिसत नाही.

उत्तर मुंबईत आघाडी अडली
महाविकास आघाडीत काँग्रेसला उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात अजून सक्षम उमेदवार सापडलेला नाही. त्यामुळे उत्तर मुंबईत काँग्रेसला प्रचार रखडला आहे. भाजपने उत्तर मुंबईतून केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांना उमेदवारी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.