मलकापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क:
तालुक्यातील दुधलगाव येथे शेतातील खोलीला सकाळच्या सुमारास अचानक आग लागल्याने यात ३५ वर्षीय शेतकर्याचा जळून मृत्यू झाल्याची घटना आज १५ फेब्रुवारी रोजी घडली.
याबाबतची अधिक माहिती अशी की, तालुक्यातील ग्राम दुधलगाव येथील शेतकरी गणेश विजय नारखेडे (३५) हे काल रात्रीच्या सुमारास शेतात पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते. तर रात्री उशीर झाल्याने शेतकरी गणेश नारखेडे हे आपल्या शेतातील खोलीत झोपले होते. सदर खोलीला रात्रीच्या सुमारास अचानक आग लागल्याने या आगीत त्यांचा होरपळून मृत्यू झाला.
सदर घटना सकाळच्या सुमारास शेतात जाणार्या शेतकर्यांना व गावकर्यांना लक्षात येताच त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक एफ.सी.मिर्झा यांनी आपल्या टीम समवेत तात्काळ घटनास्थळ गाठत पुढील कारवाई केली.
मात्र या आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. सदर घटना कशामुळे घडली याचा शोध पोलीस घेत असून घातपाताची शक्यता वर्तविली जात आहे.