“एनसीबी झाली; आता ईडीची बारी”- मलिकांचा भाजपला इशारा

0

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क

पुण्यात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मलिकांनी नवा गौप्यस्फोट केला आहे. एनसीबी झाली, आता ईडीची बारी”, असं म्हणत मलिकांनी भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला.

ईडीने माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांना नोटीस पाठवल्यानंतर ईडीच्या कार्यालयात जाणार असल्याची घोषणा करण्याचा सल्ला मीच पवार यांना दिला होता, अस नवाब मलिकांनी म्हटलं आहे.

या कार्यक्रमात नवाब मलिक यांनी भाजपवरही निशाणा साधला. यावेळी माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, आमदार चेतन तुपे, माजी महापौर अंकुश काकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे आणि गजानन थरकुडे, काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष अभय छाजेड, महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, नगरसेविका नंदा लोणकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते प्रदीप देशमुख आदी उपस्थित होते.

पवार यांना ईडीनं नोटीस पाठवल्यानंतर आपल्या सल्ल्यानुसार पवार यांनी भूमिका घेतल्याचा गौप्यस्फोट नवाब मालिक यांनी केला. शरद पवार यांना ईडीनं नोटीस पाठवल्यानंतर काय करायचं यावर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं बैठक घेतली होती.

या बैठकीत काही जणांनी वकिलांचा सल्ला घेण्याची सूचना केली. मात्र तेव्हा ही कायदेशीर लढाई नसून राजकीय लढाई असल्याचं निदर्शनास आणून दिलं. नंतर पवार यांना ईडीच्या कार्यालयात जाण्याची घोषणा करण्यास सांगितलं. त्यावर पवार यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यात या निर्णयाची घोषणा करण्यात आली होती.

“एनसीबी झाली, आता ईडीची बारी आहे. मी आता ईडीचा पर्दाफाश करणार. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भंडाफोड करण्यासाठी हायड्रोजन बॉम्ब मी अजून फोडलेला नाही. तो योग्यवेळी नक्कीच फोडेन. माझ्याकडेही भाजपवाल्यांच्या अशा सीडी आहेत की ज्या लावल्या तर यांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही”, असा खळबळजनक दावा नवाब मलिकांनी केला.

‘ईडी कारवाईला राजकीय मार्गानेच प्रत्युत्तर द्यावं लागेल’ “विधानसभा निवडणुकीच्या आधी ईडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना समन्स बजावण्यात आले होते. शरद पवारांनी त्यावेळी ईडीच्या कार्यालयात जावं, ही भूमिका त्यावेळी सर्वप्रथम मी पक्ष बैठकीत मांडली होती. पवारांनी ती उचलून धरताच पुढे काय झालं हे आपल्या सर्वांना माहितच आहे.

ईडीच्या कारवाईविरोधात कायदेशीर मार्गाने नाहीतर राजकीय मार्गानेच प्रत्युत्तर द्यावं लागेल, असं मी त्यावेळीच शरद पवारांना सांगितलं होतं”, असं नवाब मलिक म्हणाले. ‘आम्ही सरकार पाडण्याचा डाव हाणून पाडला’ “माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही खोट्या आरोपात गोवण्यात आलं. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे नातेवाईक यांना ईडीची भीती दाखवून हे मविआ सरकार पाडण्याचा डाव होता. पण आम्ही तो हाणून पाडला”, असा दावा नवाब मलिकांनी केला.

तसेच “हा माझा व्यक्तिगत लढा नाही, तर केंद्रीय तपास यंत्रणांविरोधातला लढा आहे. म्हणूनच मी एनसीबीच्या बोगस केसेस उघड केल्या. मनातली भीती काढून टाकून भाजपविरोधात लढा. नक्कीच यश येईल”, असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं.

‘मी भाजपची झोप उडवल्याशिवाय राहणार नाही’ “इतके दिवस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भाजपचं ओझं खांद्यावर वाहत होते. बहुतेक त्यांना ऑपरेशन करुन घ्यावे लागले. बरं झालं त्यांनी वेळीच हे भाजपचं ओझं खांद्यावरुन उतरवलं. देश पातळीवर शरद पवार काँग्रेसला सोबत घेऊनच भाजपविरोधात विरोधकांची मोट बांधतील. काळजी नसावी. जो डर गया वो मर गया. एवढंच सांगतो. मी भाजपची झोप उडवल्याशिवाय राहणार नाही”, अशा शब्दांत नवाब मलिकांनी निशाणा साधला.

 

Leave A Reply

Your email address will not be published.