अनेकांची पत्रे उडाली, शेतकऱ्यांचे ठिबक संच झाले जमा
पाचोरा , लोकशाही न्युज नेटवर्क
पाचोऱ्यात ग्रामीण भागासह शहरात दुपारी बारा वाजेच्या दरम्यान सुसाट्याचा वारा आला. यात शहरासह ग्रामीण भागातील घरांवर व भर रस्त्यावर झाडांच्या फांद्या तुटून पडल्याने काही घरांचे नुकसान झाले. तर अनेक गावांमध्ये घराच्या छतावरील पत्रे उडाली. ग्रामीण भागात झाडे उल्मळून पडल्याने बराच काळ रहदारीस अडथळा निर्माण झाला होता. पाचोरा शहरातील भुयारी मार्गात झाडांची फांदी तुटल्याने वाहतूकीस अडथळा निर्माण झाला होता. बाहेरपूरा भागात अनेक झाडे उल्मळून पडल्याने घरांचे नुकसान झाले आहे. भडगाव रोडवरील निर्मल उद्यानाजवळ बदामाच्या झाडाची फांदी तुटल्याने चहाच्या टपरीधारकाचे मोठे नुकसान झाले. जारगाव चौफुली जवळील वेंकटेश गोपाल मंगल कार्यालयाची भिंत पडल्याने आर्थिक नुकसान झाले आहे. सुदैवाने या ठिकाणी कोणत्याही कार्यक्रम नसल्याने जीवीत हानी टळली. ग्रामीण भागात शेतकऱ्यांनी ठिबकच्या नळ्या पसरवून ठेवलेल्या असल्याने त्या हवेमुळे गोळा झाल्या तर काही शेतकऱ्यांचे लिंबूच्या बागांचे नुकसान झाले. सुसाट्याच्या वाऱ्यामुळे लाईट गुल झाली होती. रिमझीम पावसामुळे हवेत काहीसा गारवा निर्माण झाला आहे.