नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क:
नव्याने बांधण्यात आलेल्या संसद भवनाचे उद्घाटन पंतप्रधानांनी नव्हे तर राष्ट्रपतींच्या हस्ते व्हायला हवे, असे मत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 मे रोजी संसदेच्या नव्याने बांधलेल्या इमारतीचे उद्घाटन करणार आहेत. लोकसभा सचिवालयाने सांगितले होते की, नव्याने बांधलेल्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी गुरुवारी पंतप्रधान मोदींची भेट घेतली आणि त्यांचे उद्घाटन करण्याचा आग्रह केला.
राहुल गांधी यांनी ट्विट करून केले आवाहन…
आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट केले की, “राष्ट्रपतींनी नवीन संसद भवनाचे उद्घाटन करावे, पंतप्रधानांनी नाही.” नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाची तारीख 28 मे निश्चित करण्यात आली आहे. याच दिवशी हिंदुत्ववादी विचारवंत व्ही डी सावरकर यांची जयंती असून अनेक विरोधी पक्षांनी त्यावरून सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रेसने हा राष्ट्रनिर्मात्यांचा अपमान असल्याचे म्हटले आहे.
नए संसद भवन का उद्घाटन राष्ट्रपति जी को ही करना चाहिए, प्रधानमंत्री को नहीं!
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 21, 2023
विशेष म्हणजे नवीन संसदेची रचना किमान 150 वर्षे टिकेल अशी करण्यात आली आहे. सध्याचा परिसर 100 वर्षांहून अधिक काळापासून अस्तित्वात आहे. नवीन त्रिकोणी-आकाराच्या संसद भवनाचे बांधकाम 15 जानेवारी 2021 रोजी सुरू झाले आणि ऑगस्ट 2022 पर्यंत पूर्ण होणार होते. टाटा प्रोजेक्ट्सने अंदाजे 970 कोटी रुपये खर्चून संसद भवन बांधले आहे.
1,272 सदस्यांसाठी आसनव्यवस्था…
लोकसभा सचिवालयाने संसद भवनावर तयार केलेल्या पुस्तिकेनुसार, नवीन संसद भवनाच्या लोकसभेच्या कक्षेत 888 सदस्यांची आसनव्यवस्था असेल आणि राज्यसभेत 384 सदस्य बसू शकतील. संयुक्त अधिवेशनादरम्यान, सभागृहात 1,272 सदस्यांची बसण्याची व्यवस्था असेल. पंतप्रधानांनी 10 डिसेंबर 2020 रोजी संसदेच्या नवीन इमारतीची पायाभरणी केली होती.