लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्यात सत्ताबदल झाल्याने राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. दरम्यान भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक महत्वाची मागणी ही नव्या सरकारकडे केलेली आहे. सरपंच आणि नगराध्यक्ष यांची निवड ही महाविकास आघाडी सरकारच्या काळात सदस्यांमधून व्हायची मात्र आता यात बदल होवून ही निवड थेट जनतेतून होऊ शकते असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. या संदर्भात भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी माहिती दिली. सदस्यांमधून नगराध्यक्षांची निवड झाल्यास भ्रष्टाचार वाढीस लागतो. तसेच स्थानिक स्वराज्य संस्था अस्थिर होत असतात यामुळे नगराध्यक्षांची निवड जनतेतून केली जावी अशी मागणी बावनकुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेली आहे. तसेच भाजप सरकार असतांना जनतेतून नगराध्यक्षांची निवड व्हावी यासाठी कायदा करण्यात आला होता मात्र आघाडी सरकार सत्तेत आल्यावर त्यांनी सदस्यांमधून निवड करण्याची पद्धत अवलंबली. यामुळे पुन्हा एकदा पूर्वीची पद्धत लागू करावी असे भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले.