वृक्षतोडीला आळा कधी ? साकळी परिसरात राजरोसपणे सुरुये झाडांची कत्तल…

0

मनवेल, लोकशाही न्युज नेटवर्क;

 

गेल्या अनेक दिवसांपासून साकळीसह परिसरातील शेतशिवारांमध्ये राजरोसपणे व कोणाचाही धाक न बाळगता हिरव्यागर्द झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल सुरु आहे. शेतीच्या बांधांवर उभे असलेले हिरवेगार असे मोठ- मोठी झाडे तोडले जात आहे. जर परिसरात अशीच मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरु राहिली तर परिसर लवकरच भकास व उजाड व्हायला वेळ लागणार नाही. एकूणच या वृक्षतोडीच्या भयावह चित्राकडे संबंधित वनविभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष का होत आहे ? असा प्रश्न वृक्षप्रेमी नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
याबाबत सविस्तर असे की, एकीकडे शासनाच्या वनविभागाकडून झाडे व जंगले वाचवण्यासाठी तसेच झाडे लावण्यासाठी व जगवण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करून विविध असे कार्यक्रम राबवले जात असतात. या गोष्टीचा जाहिरातींद्वारे मोठा उहापोह केला जात असतो. मात्र दुसरीकडे साकळी परिसरात अगदी राजरोसपणे व वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या नाकावर टिच्चून हिरव्यागर्द झाडांची कत्तल मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या वृक्षतोडीमुळे परिसरातील जंगले दिवसेंदिवस कमी होत आहे. याचा थेट परिणाम पावसावर झालेला आहे. गेल्या काही वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी होत असल्याचे जाणवत आहे. या वृक्षतोडीमध्ये लिंब,बाभूळ यासह इतर आड जातींच्या मोठ-मोठ्या झाडांची सर्रासपणे वृक्षतोड चालू असून रात्रीच्या अंधारात तोडलेल्या झाडांच्या लाकडांची वाहतूक सुरू असते.
या वृक्षतोडीच्या व्यवसायांमध्ये काही गल्लीछाप पुढारी,स्वतःला म्हणून घेणारे सामाजिक कार्यकर्ते, पंटर, लाकूड व्यावसायिक गुंतले असून अगदी राजरोसपणे व कोणालाही न घाबरता अवैधपणे सुरू असलेल्या वृक्षतोडीच्या व्यवसायातून पुढारी व लाकूड व्यावसायिक हे सर्वजण मोठी ‘मोहमाया’ जमवीत आहे तर आपल्या वैयक्तिक स्वार्थापोटी निसर्गाला मोठी हानी पोहोचत आहे. मात्र अवैधरित्या सुरु असलेल्या वृक्षतोडीकडे संबंधितांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या सर्व अवैध लाकूड तोडीच्या व्यवसायाला वनविभागाच्या अधिकाऱ्यांचा आशीर्वाद आहे का ? असा संतप्त प्रश्न निसर्गप्रेमींकडून उपस्थित केला जात आहे.
परिसरात होणाऱ्या बिनबोभाट वृक्षतोडीमुळे साखळीसह परिसरातील पावसाचे प्रमाण गेल्या काही वर्षांपासून कमी झालेले असून हीच वृक्षतोड सर्रासपणे सुरू राहिली तर साकळी परिसरातील जंगल नष्ट होऊन परिसर भकास व्हायला वेळ लागणार नाही. अशी चिंता वृक्षप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे. तरी सदर परिसरातील अवैध वृक्षतोड तात्काळ थांबविली जावी व वृक्षतोड करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पर्यावरण प्रेमींकडून केली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.