खंडवा, लोकशाही न्यूज नेटवर्क;
मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील बांगर्डा गावात २० वर्षीय आदिवासी मुलीवर चाकूने वार करणाऱ्या त्याच आरोपीचा मृतदेह आता सापडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीचा मृतदेह इंदिरा सागर धरणाच्या मागील पाण्यात आढळून आला, आरोपी बबलूने बांगर्डा, खंडवा येथील पीडितेच्या घरात घुसून हल्ला केला होता, त्यानंतर तो फरार झाला होता.
या हल्ल्यात जखमी तरुणी गंभीर अवस्थेत जीवाशी लढत असून, तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. खंडवाचे एसपी विवेक सिंह यांनी सांगितले की, आज सकाळी त्याचा (बबलू) मृतदेह धरणाच्या पाण्यामध्ये सापडल्याची माहिती मिळाली, प्रथमदर्शनी ही आत्महत्या असल्यासारखे दिसत असल्याचे म्हटले जात आहे. मात्र पोस्टमॉर्टमनंतरच संपूर्ण माहिती मिळेल.
मिळालेल्या माहितीनुसार, मुलगी आणि तिची बहीण घरात असताना चौकीदार बबलूने तरुणीवर हल्ला केला. मुलीने त्या व्यक्तीचा लग्नाचा प्रस्ताव धुडकावून लावल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर त्याने हे पाऊल उचलले असल्याचेही म्हटले जात आहे.
मुलीच्या मानेवर आणि हाताला खोलवर जखमा झाल्यामुळे तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. काही महिन्यांपूर्वी त्याच्या चौकीदार वडिलांच्या मृत्यूनंतर, बबलूला अनुकंपा तत्त्वावर गावातील चौकीदार म्हणून नियुक्त करण्यात आले. खंडवा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक विवेक सिंह यांच्या म्हणण्यानुसार, “डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करूनही मुलीची प्रकृती चिंताजनक आहे.”