तेलंगणा, लोकशाही न्यूज नेटवर्क;
तेलंगणातील वारंगल जिल्ह्यात एक भीषण अपघात झाला आहे. येथील चार इंटरमिजिएटच्या विद्यार्थ्यांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. निकाल जाहीर झाल्यानंतर हे सर्व विद्यार्थी परीक्षेतील यशाचा आनंद साजरा करून परतत असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वारंगल-खम्मम महामार्गावरील वर्धनापेट शहराच्या हद्दीत मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली.
विद्यार्थी एकाच दुचाकीवरून जात होते
पोलिसांनी सांगितले की, चारही विद्यार्थी एकाच दुचाकीवरून जात होते आणि विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका खासगी बसला दुचाकी धडकली, त्यानंतर तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर चौथ्याचा वारंगलच्या एमजीएम रुग्णालयात मृत्यू झाला. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे वय १७ वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एम. सिद्धू, पी. गणेश, वरुण तेज आणि पी. रानिल कुमार अशी मृतांची नावे आहेत. गणेश हा वर्धनापेट येथील रहिवासी होता, तर अन्य तिघे शहराजवळील येलंदा गावातील रहिवासी होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांनी इंटरमिजिएट परीक्षा दिली होती, त्याचा निकाल बुधवारी लागला. परीक्षेत उत्तीर्ण झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी हे चौघेही जेवायला बाहेर गेले होते आणि घरी परतत असताना त्यांचा अपघात झाला. वाटेत दुचाकीचे नियंत्रण सुटले आणि विरुद्ध दिशेने येणाऱ्या बसला धडक दिली.