जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:
हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे. यामुळे तापी व पुर्णा या दोन्ही नद्यांना पूर आल्याने धरणाची पाण्याची पातळी वाढल्याने धरणाचे सर्व एक्केचाळीस दरवाजे उघडण्यात आले असून तापी नदी दुथडी भरून वाहत आहे. दरम्यान नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
धरणाच्या पाणलोट क्षेत्रात बुधवार दि १९ रोजी ४५९.८ मिमी पाऊस झाल्याने तापी, पुर्णा नदीला पूर आला असल्याने धरणात पाण्याची आवक सतत वाढत असल्याने २०९.२० मी पाण्याची पातळी असून धरणाचे सर्वच एक्केचाळीस दरवाजे पुर्ण क्षमतेने उघडले आहेत. त्यातून पाण्याचा विसर्ग ३५८८ क्युसेक्सने होत आहे.
हतनूर धरणातील विसर्गामुळे तापी नदीकाठच्या गावांमध्ये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. नदीकाठच्या गावातील शाळांना स्थानिक परिस्थितीनुसार शिक्षणाधिकारी यांनी सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घ्यावयाच्या आहेत. अशा सूचना जिल्हाधिकारी अमन मित्तल (Collector Aman Mittal) यांनी दिल्या आहेत.