जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:
जळगाव जिल्ह्यात सध्यस्थितीत पोलिसांचा आणि कायदा सुव्यवस्थेचा कसलाही भय नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे चोरी, दरोडे आणि खुनाचे प्रमाण जास्त प्रमाणात वाढले आहे. त्यातच काल रात्री गिरणा नदीपात्रात शौचास गेलेल्या आशीष प्रकाश शिरसाळे (22) या तरुणावर कुर्हाडीने घाव घालून त्याचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास बांभोरी गावाजवळ घडली. या घटनेमुळे एकच खळबळ माजली असून याप्रकरणी पाळधी दूरक्षेत्र पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धरणगाव तालुक्यातील बांभोरी गावात नदीपात्राजवळ आशीष प्रकाश शिरसाळे हा तरुण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास असून तो मजूरी काम करुन कुटुंबाला हातभार लावित होता. शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास आशिष हा गावालगत असलेल्या गिरणा नदीपात्रात शौचास गेला होता. त्याठिकाणी आशिषवर कुर्हाडीने घाव घालून त्याचा निर्घृण खून करण्यात आला. बराच वेळ झाला तरी मुलगा घरी न परतल्यामुळे त्याच्या कुटुंबियांनी नदीपात्रात आशिष चा शोध घेण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांना रक्ताच्या थारोळ्यात आशिषचा मृतदेह दिसून आला. त्यांनी मृतदेह बघताच मनहेलावणारा आक्रोश केला.
खूनाची माहिती मिळताच पाळधी दूरक्षेत्र पोलीस ठाण्याच्या कर्मचार्यांसह स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली होती. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करण्यास सुरुवात केली असून तपासचक्रे फिरविली असून चौकशीसाठी काही जणांना ताब्यात देखील घेण्यात आले आहे. आशिषची क्रूर हत्या नेमकी कशामुळे झाली याचा तपास सुरू आहे. दरम्यान, तरूण आशिषच्या क्रूर हत्येमुळे परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आशिष शिरसाळे याच्या खून प्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात खूनचा गुन्हा दाखल करण्यात आहे.