मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
लोकसभा निवडणुकीसाठी सांगली आणि भिवंडीच्या जागेवरुन गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीमध्ये सुरु असलेली धुसफूस सर्वश्रुत आहे. याबाबत स्पष्टता देण्यासाठी व जागावाटपाचा फॉर्म्युला सांगण्यासाठी मविआने एकत्रित पत्रकार परिषद आयोजित केली होती. या परिषदेत ठाकरे गट 21, काँग्रेस 17 तर शरद पवार गट 10 जागा लढवणार असल्याचे सांगण्यात आले. त्यातील वादग्रस्त सांगलीची जागा ही ठाकरे गटाकडेच तर भिवंडीची जागा ही शरद पवार गटाकडेच राहणार आहे, त्यामुळे परिषदेनंतरही काँग्रेसच्या गोटात कमालीची नाराजी पसरली असल्याचे चित्र आहे.
मविआची पत्रकार परिषद पार पडल्यानंतर काँग्रेस नेते काही न बोलताच निघून गेले. त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्टपणे दिसून आली. तर दुसरीकडे परिषदेनंतर मविआचे तीन प्रमुख नेते उद्धव ठाकरे, नाना पटोले आणि शरद पवार यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. त्यामुळे परिषद घेतल्यानंतरही मुख्य नेत्यांमध्येच समन्वय नाही की काय, असा एक मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. ‘काँग्रेस पक्षाला मुंबईत समाधानकारक जागा मिळालेल्या नाहीत. ज्या जागांवर आम्ही निवडून येऊ शकतो, त्या जागा आम्हाला मिळालेल्या नाहीत’, असे काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांचे मत आहे. तसेच, ज्या जागांवर आमची ताकद नाही, अशा जागा देण्यात आल्याची नाराजीही काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केली आहे.
सांगलीचा वाद चिघळला ?
सांगलीमध्ये ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील हेच निवडणूक लढवणार आहेत, त्यामुळे काँग्रेसच्या गोटात शांतता पसरली आहे. सांगलीच्या काँग्रेस भवन आणि विशाल पाटील यांच्या कार्यालयाबाहेर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. काँग्रेसच्या विशाल पाटलांनी वेगळी भूमिका घेण्याचे संकेत दिले आहेत. एकिकडे विश्वजीत कदम आणि विशाल पाटील नॉटरिचेबल असताना दुसरीकडे सांगलीतील काँग्रेसचे कार्यकर्तेही नाराज झाले आहे. विशाल पाटलांच्या समर्थकांनी ‘आमचे काय चुकलं? आता जनतेच्या कोर्टात लढायचे’ असे लिहिले असून विशाल पाटील यांचा हात जोडतानाचा उभा फोटो पोस्ट केला आहे.