जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:
जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील अमळगावच्या पुढे मेहरगाव फाट्यावर टाटा मॅजिक व अॅपेरिक्षाच्या धडकेत त्यात खेडीखुर्द येथे बहिणीच्या घरी यात्रेसाठी गेलेल्या 21 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर दोन जण यामध्ये जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. अश्विनी गुलाब भामरे (21) असे मृत तरुणीचे नाव आहे.
मिळालेल्या महिनुसार या घटनेतील दोषी वाहन चालकाविरुद्ध मृत युवतीच्या मेव्हण्याने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला. आणि तत्काळ मारवड पोलिसांनी दोन तासामध्ये वाहनचालकाला अटक करून न्यायालयात हजर केले. दरम्यान न्यायालयाने त्याची पाच दिवसांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. धुळे जिल्ह्यातील मेहरगाव येथील रहिवासी अश्विनी गुलाब भामरे ही 21 वर्षीय युवती अमळनेर तालुक्यातील खेडीखुर्द येथे बहिणीच्या घरी अमळनेर येथील यात्रोत्सव पाहण्यासाठी आली होती.
रात्री यात्रेत जायचं ठरल्याने त्यानुसार रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास अश्विनी ही तिच्या बहिणीची सासू, बहिणीची नणंद या दोघांसोबत एमएच 19 बीजे 8996 या क्रमाकांच्या रिक्षातून अमळनेरकडे जाण्यासाठी निघाले. अश्विनीची बहिण आणि मेव्हणे हे दोघे दुचाकीवरून रिक्षासोबत मार्गस्थ झाले. अमळगाव पुढील मेहेरगाव फाट्याजवळ एमएच 19 बीजे 1405 या क्रमाकांच्या टाटा मॅजीक या भरधाव वाहनाने रिक्षाला जोरदार धडक दिली. या धडकेत रिक्षा उलटली, यात अश्विनी हिच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन तिचा जागेवरच मृत्यू झाला. अपघात एवढा भयंकर होता की, यात अश्विनीच्या डोक्याची कवटी फुटली होती. तर रिक्षातील रेखाबाई पाटील आणि वर्षा हर्षल बोरसे हे दोन्ही जखमी झाले होते. रिक्षाच्या मागे येत असलेल्या मेव्हण्यांनी तात्काळ जखमींना रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात अश्विनी हिला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. डोळयासमोर लहान बहिणीचा मृत्यू बघून मोठ्या बहिणीने हंबरडा फोडला. दरम्यान अपघातील जखमी रेखाबाई पाटील आणि वर्षा बोरसे या दोघींवर अमळनेर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
या अपघात प्रकरणी रविवारी दुपारी मत अश्विनी हिचे मेव्हणे निलेश प्रवीण पाटील यांच्या फिर्यादीवरून एमएच 19 बीजे 1405 या क्रमाकांच्या वाहनावरील योगेश रोहिदास पाटील रा. अमळगाव या चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासी अंमलदार संजय पाटील यांनी दोन तासात वाहनचालक योगेशला ताब्यात घेऊन अटक केली व दुपारी 2 वाजता अमळनेर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
अश्विनी हिचे बारावीपर्यंत शिक्षण झाले होते. तिच्या पश्चात आई वडील, भाऊ असा परिवार आहे. अश्विनी हिच्या लग्नाबाबत बोलणी सुरु होती. 16 एप्रिल रोजी लग्न पक्के झाले होते. लग्नाची तारीख ठरणार तोच अपघाताच्या रूपाने अश्विनी हिच्यावर काळाने झडप घातली आणि लग्नापूर्वीच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. लग्न जमलेल्या तरुणीचा लग्नापूर्वीच मृत्यू झाल्याच्या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.