भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:
तालुक्यात एक अत्यंत दुखद घटना समोर आली आहे. भडगाव तालुक्यातील बहाळ कसबे गावात पतीच्या अपघाती निधनानंतर पत्नी उज्ज्वला पाटील यांनी ही शुक्रवारी सकाळी विषारी औषध प्राशन करत आपली जीवन यात्रा संपवल्याची घटना घडली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, बहाळ येथील संदीप पाटील यांची स्वतःची आयशर गाडी होती. ते या गाडीच्या माध्यमातून आपला व्यवसाय करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. दरम्यान, संदीप पाटील हे १० तारखेला आपल्या आयशर गाडीत भाजीपाला घेऊन जात असतांना त्यांचा खडकी फाट्याजवळ अपघात झाला होता. या अपघातात संदीप पाटील यांचा जागीच मृत्यू झाला होता. यामुळे त्यांची पत्नी उज्ज्वला पाटील (३०) या नैराश्यात होत्या, त्यांना आपल्या पतीच्या विरहाने ग्रासून सोडले होते. दरम्यान शुक्रवारी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास त्यांनी नैराश्यातून विषारी पदार्थ प्राशन करुन आत्महत्या केल्याची सर्वत्र चर्चा आहे. चाळीसगाव येथे शवविच्छेदन करुन त्यांच्या मृतदेहावर दुपारी १ वाजता शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. उज्ज्वला पाटील यांना दोन मुले असून मोठा मुलगा हितेश हा ११ वर्षांचा तर लहान मुलगा रोहित हा ९ वर्षांचा आहे. दरम्यान, आईचा मृतदेह पाहून या दोन्ही लहान मुलांनी टाहो फोडल्याने उपस्थितांचे डोळे पाणावले होते.