नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क
देशातील बहुतांश राज्यांत आजही थंडीचा कडाका कायम आहे. मात्र, दिवसा सूर्यप्रकाश पडत असल्यानं तापमानातही वाढ झालीय, त्यामुळं लोकांना काहीसा दिलासा मिळालाय.
दरम्यान, हवामान खात्यानं पुढील पाच दिवस काही राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा दिलाय. यासोबतच हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, उत्तरेकडील डोंगराळ भागातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय.
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, पुढील पाच दिवस तामिळनाडूत जोरदार वाऱ्याची तीव्रता असून तामिळनाडूसह केरळात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट बाल्टिस्तान, मुझफ्फराबादच्या बहुतांश भागात पुढील पाच दिवस पाऊस बरसण्याची शक्यता वर्तवलीय. हिमाचल प्रदेशातील बहुतांश भागात 18 ते 20 फेब्रुवारीदरम्यान पाऊस होईल, असाही अंदाज आहे.
दरम्यान, 20 फेब्रुवारी रोजी उत्तराखंडच्या काही भागात पाऊस कोसळू शकतो. तर, पुढील 3 दिवस अंदमान आणि निकोबार बेटांवर वादळाचा इशारा देण्यात आलाय. त्यामुळं अंदमान आणि निकोबारमध्ये येत्या 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. याशिवाय, पश्चिम बंगाल आणि सिक्कीमच्या काही भागातही पाऊस पडू शकतो. हवामान खात्याच्या माहितीनुसार, पश्चिम बंगाल, ओडिशा, बिहार आणि झारखंडमध्ये 20 फेब्रुवारीला, तर मध्य प्रदेशमध्ये 18 ते 19 फेब्रुवारी आणि छत्तीसगडमध्ये 19 आणि 20 फेब्रुवारीपर्यंत पावसाची शक्यता आहे.