जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
आज स्वाभिमानी सभेनिमित्त शरद पवार जळगावात आहेत. यावेळी सभेत त्यांनी भाजपसह सरकारवर तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ‘मोदींनी गेल्या 9 वर्षात फोडाफोडीचे राजकारण केले, मोदीसाहेबांनी राष्ट्रवादी फोडली, शिवसेना फोडली,’ असा आरोप पवार यांनी केला आहे. तसेच या देशात तपास यंत्रणांचा गैरवापर या सरकारकडून करण्यात आला, कारण नसतांना अनेकांना तुरुंगात ठेवण्यात आले, अशा शब्दात पवार यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.
मोदी भोपाळला गेले. त्यांनी तिथे राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली. त्यांनी हे लोक भ्रष्ट असल्याचा आरोप केला. आमच्याकडे अनेकांची माहिती असल्याचा इशारा दिला. माझे त्यांना एकच सांगणे आहे, कुणी चुकीचे काम केले असेल, तर त्याच्याविरोधात खटला भरा. चौकशी करा. पण तुमचे आरोप खोटे टरले, तर तुम्ही स्वतःला कोणती शिक्षा देणार? हेही संपूर्ण देशाला सांगा. खोटे आरोप करणे देशहिताचे नाही. पंतप्रधान मोदींनी सत्तेचा वापर जनतेसाठी केला नाही. त्यांनी सीबीआय, ईडीच्या धाडी टाकून लोकांवर खोटे खटले दाखल करण्याचे काम केले. अनिल देशमुखांनी याचा उल्लेख केला. नवाब मलिकांनाही त्यांनी तुरुंगात डांबले. अनेकांना तुरुंगात टाकले. भाजपने लोकांनी दिलेल्या सत्तेचा जनतेला सन्मानाने वागवण्यासाठी न करता त्याचा गैरवापर केला, असा घणाघात हल्ला शरद पवारांनी मोदींवर केला.