जळगाव जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १९ कोटी ७३ लाखांची मदत

0

जळगांव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगांव जिल्ह्यातील सन २०२२ मध्ये २७४ गावातील १५,६६३ शेतकऱ्यांच्या केळी पीकाचे सी.एम.व्ही. (कुकुंबर मोझंक व्हायरस) या रोगामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना १९ कोटी ७३ लक्ष एवढी रुपये मदत वितरण करण्याचे आदेश मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिले असून, याबाबतचा शासन निर्णय नुकताच काढण्यात आला आहे. (कुकुंबर मोझॅक व्हायरस) या रोगामुळे केळी या बहुवार्षिक पीकांचे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पहिल्यांदाच अशा प्रकारची मदत देण्यात आलेली आहे.

केळी हे बहुवार्षिक पिक जळगांव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण पीक आहे. जळगांव जिल्ह्याला केळीचे आगार मानले जाते मात्र केळी उत्पादक शेतकऱ्यांचे सन २०२२ मध्ये सी.एम.व्ही. या केळी पीकावरील रोगामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. सन २०२२ मध्ये जळगांव जिल्ह्यातील एकूण २७४ गावातील १५६६३ शेतकऱ्यांच्या केळी पीकाचे सी.एम.व्ही. (कुकुंबर मोझंक व्हायरस) या रोगामुळे नुकसान झाले आहे. या रोगामुळे बाधीत झालेले एकूण क्षेत्र ८७७१ हेक्टर एवढे होते. जिल्ह्यातील सर्व बाधीत शेतकऱ्यांना २ हेक्टरच्या मर्यादेचा निकष पाळून दि.२७ मार्च २०२३ च्या शासन निर्णयातील सुधारीत दर व निकषांप्रमाणे एकूण १९ कोटी ७३ लक्ष एवढी मदत देण्यात आली आहे, वातावरणातील बदलामुळे केळी उत्पादक शेतकरी हा अडचणीत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे प्रतिकूल परस्थिती असतानाही शेतकरी मोठ्या प्रमाणात केळी पीक घेत असतात.

तत्कालीन वादळी पावसाच्या तडाख्याने केळीबागांवर मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते आणि शेतकऱ्यांनी नविन लागवड केलेल्या केळीबागांवर हे नविन संकट आले होते. हे संकट आस्मानी नसून एका व्हायरसचे होते. नविन केळीच्या खोडावर कुक्कूंबर मोझॅक व्हायरस (सीएमव्ही) याचा प्रादुर्भाव दिसून आला होता. जून महिन्यात २०२२ मध्ये झालेल्या वादळी पावसाने अनेक ठिकाणी केळी जमिन दोस्त झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पहिल्यांदाच अशा प्रकारची मदत देण्यात आलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना यातून दिलासा मिळेल.

Leave A Reply

Your email address will not be published.