मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क:
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तुरुंगाबाहेर येताच समर्थकांचे आभार मानले. माध्यमांशी बोलतांना त्यांनी म्हटलं की, माझी अटक बेकायदेशीर आहे. पण आम्ही लढणारे आहोत. कार्यकर्ते जमले आहेत, त्यांनी कार्यक्रम ठरवला आहे त्याप्रमाणे होईल. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाणार असल्याचंही संजय राऊत यांनी म्हटलं.
आम्ही आधीपासून जे बोलत होतो, तेच निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं आहे. आम्हाला आनंद आहे, न्यायालयावर विश्वास वाढला आहे. तब्येत जरा बरी नाहीये. मला बरं वाटलं की मी माध्यमांशी नक्की बोलेन, असं संजय राऊत यांनी म्हटलं.
झुकेंगे नही म्हटलं होतं, त्यासाठीच 100 दिवस जेलमध्ये काढले. सध्याच्या परिस्थितीचा आम्ही सामना करु. उद्धव साहेबदेखील आनंदी आहेत. त्यांच्याशी फोनवर चर्चा झाली आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं.
संजय राऊत तब्बल 100 दिवसांनी तुरुंगाबाहेर आले आहेत. कथित पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात संजय राऊतांना आज जामीन मंजूर झाला आहे. जामीन मंजूर झाल्यानंतर त्यांची आर्थररोड कारागृहातून सुटका करण्यात आली आहे. ही बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे. यावेळी गाडीवर उभं राहत संजय राऊत यांनी समर्थकांचे आभार मानले. आर्थररोड कारागृहाबाहेर शिवसैनिकांनी प्रचंड गर्दी केली आहे.
संजय राऊतांना अवैध पद्धतीने अटक कोर्टाने ओढले ताशेरे…
पीएमएलए कोर्टाच्या ऑर्डर कॉपीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रविण आणि संजय राऊत यांना अवैध पद्धतीने अटक करण्यात आल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे ईडीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. मुख्य आरोपी राकेश वाधवान, सारंग वाधवान आणि या घोटाळ्यातील सरकारी अधिकारी यांच्यावर कारवाई का झाली नाही, त्यांना अद्याप अटक झालेली नाही. प्रविण राऊत आणि संजय राऊत यांनी कायदेशीर पद्धतीने असल्याचं पटवून देण्याच्या सूचना कोर्टाने केली आहे. या सर्व बाबींमुळे सेशन कोर्ट आणि हायकोर्टाने ईडीवर ताशेरे ओढले आहेत.