क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क:
विंडीज दौऱ्यानंतर आयर्लंडला जाणाऱ्या टीम इंडियामधून हार्दिक पांड्याला विश्रांती दिली जाऊ शकते, अशी बातमी समोर येत आहे. विंडीजविरुद्धची पांढऱ्या चेंडूंची मालिका संपल्यानंतर भारतीय संघ तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी आयर्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हार्दिक आशिया कपमध्येही खेळणार आहे. आणि तो विश्वचषक २०२३ च्या योजनेचा महत्त्वाचा भाग आहे. अशा परिस्थितीत त्याला पूर्णपणे तंदुरुस्त, ताजेतवाने ठेवणे हे बोर्डाचे सर्वोच्च प्राधान्य आहे, त्यासाठी बोर्डाला हार्दिकच्या कामाचा ताण चांगल्या पद्धतीने हाताळायचा आहे.
बीसीसीआयच्या सूत्रानुसार, हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत निवडकर्ता आतिशी फलंदाज सूर्यकुमार यादवकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवू शकतात. कसोटी मालिकेनंतर पंड्या विंडीजविरुद्धच्या वनडे आणि टी-20 मालिकेतही भाग घेणार आहे.
विंडीज दौरा संपल्यानंतर अवघ्या तीन दिवसांनी आयर्लंडविरुद्धची मालिका सुरू होत आहे. अशा परिस्थितीत फक्त हार्दिकच नाही तर बोर्ड अशा काही खेळाडूंना या मालिकेपासून दूर ठेवू शकते, जे आशिया कप आणि त्यानंतर वर्ल्ड कप 2023 च्या आयोजनाचा भाग आहेत. विंडीज टी-२० फॉर्मेटपासून दूर राहणारे रोहित आणि विराट कोहली देखील या संघाचा भाग असणार नाहीत. विंडीज दौऱ्यात रोहित एकदिवसीय सामन्यांमध्ये संघाचा कर्णधार आहे, तर हार्दिक पाच टी-20 सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवणार आहे.
याबाबत अद्याप काहीही निश्चित झालेले नाही, असे सूत्राने सांगितले. विंडीज दौऱ्यानंतर कर्णधार हार्दिकला काय वाटते हेही निवड समिती पाहणार आहे. पण विंडीज दौऱ्यानंतर आयर्लंडला जाण्यासाठी भरपूर प्रवास आणि मालिकेत फक्त तीन दिवसांचा अवधी आहे. अशा परिस्थितीत जेव्हा सर्वोच्च प्राधान्य विश्वचषक 2023 आहे, तेव्हा हार्दिकसह सर्व महत्त्वाच्या खेळाडूंच्या वर्कलोड मॅनेजमेंटची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. त्याचवेळी हार्दिक विश्वचषकात उपकर्णधाराची भूमिका बजावणार आहे.