जालना ;- मराठ्यांना आरक्षण घेण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. देव जरी खाली आला तरी, मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण घेण्यापासून रोखू शकत नाही. मराठ्यांनी सावध राहण्याची गरज आहे. सरकारने एकाला अटक केली की सर्वांनी तुरुंगात जायचं. सरकारने गांभीर्यानं घेतलं नाही तर सरकारला जड जाईल,असा इशारा देखील जरांगे यांनी दिला आहे. समाजाला आवाहन करताना ते म्हणाले, नेत्याला जातीपेक्षा मोठं मानू नका, जात संकटात सापडली, पोरंही संकटात सापडली आहेत. भानावर या. आपल्या लेकरांपेक्षा मोठं आपल्यासाठी कुणीही नाही. मी तुमच्यासाठी जीव पणाला लावलाय. मला तुमच्या साथीची गरज आहे. मला तुमचं पाठबळ हवं आहे. तुमच्या आशिर्वादाची गरज आहे. तुम्ही माझ्या खांद्याला खांदा लावून लढायला हवं. सरकारनं मला शत्रू मानायला सुरुवात केली आहे. मी गरीब मराठ्यांच्या वेदना मांडल्या. काय चूक केली, असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.
सरकारला आधी ३ महिने वेळ दिला, तेव्हा समिती गठीत झाली तरीही काही झाले नाही. त्यानंतर सरकारचे शिष्टमंडळ आले, त्यांनी ३० दिवसांचा वेळ मागितला, मी ४० दिवसांचा दिला. पुन्हा आले, पुन्हा बोलले, मागणी प्रमाणे आरक्षण हवं तर आधार लागलो. पुन्हा समिती नेमली, समितीला नोंदी सापडल्या. आता तुम्हाला कायदा पारित करायला अडचण काय, असा सवालही त्यांनी राज्य सरकारला केला.