जळगाव : महापालिकेत पुढील महिन्यात कंत्राटी पध्दतीने भरती होणार असून याबाबत महापौर जयश्री महाजन यांनी आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांना सुचना केली आहे.
महापालिकेत सध्या निम्मे कर्मचाऱ्यांवर कामकाज सुरु असून दर महिन्याला कर्मचारी सेवा निवृत्त होत असल्यामुळे प्रशासनाचा गाडा चालविणे अवघड झाले आहे. त्यामुळे महापालिकेच्या प्रशासकीय कामाकाजावर परिणाम होत असल्यामुळे महापौर जयश्री सुनिल महाजन यांनी आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांना कर्मचारी भरती करण्यासंदर्भात पत्राद्वारे कळविले होते.
परंतु महापालिकेचा आकृती बंध मंजूर झाला तरी, भरतीच्या सेवा शर्ती मंजूर झालेल्या नाहीत त्यामुळे सरळसेवा भरती प्रक्रिया राबविता येत नाही. परिणामी कर्मचाऱ्यां अभावी महापालिकेला दैनंदिन कामकाजात अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे सहा सहा महिन्यांसाठी का होईना तरी, कंत्राटी पध्दतीने भरती करावी, असे आपण आयुक्त डॉ. गायकवाड यांना पत्राद्वारे कळविले होते. त्या अनुषंगाने आयुक्तांनी सर्व विभागातील रिक्त जागांची माहिती मागविली असून कंत्राटी भरतीची प्रक्रिया सुरु आहे, असेही महापौर जयश्री महाजन यांनी सांगितले