महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांचा राजभवन येथे पदग्रहण सोहळा संपन्न…

0

 

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री, अँड ॲग्रीकल्चरचे नवनिर्वाचित अध्यक्ष ललित गांधी यांचा नुकताच राजभवन येथे पदग्रहण सोहळा संपन्न झाला. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते अध्यक्ष पदाचा कार्यभार सोपविण्यात आला.

महाराष्ट्र चेंबरच्या इतिहासात ललित गांधी हे पहिलेच अध्यक्ष आहेत, ज्यांचा राजभवन मुंबई येथे पदग्रहण सोहळा झाला. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स’चे संस्थापक शेठ वालचंद हिराचंद यांच्या स्मृती व्याख्यानाचे सुवर्णमहोत्सवी पुष्प शुक्रवारी राजभवनातील दरबार हॉलमध्ये गुंफण्यात आले. त्यावेळी हा पदग्रहण सोहळा झाला. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते अध्यक्षीय ट्रॉफी देऊन पदग्रहण सोहळा झाला. तर वरिष्ठ उपाध्यक्ष अनिलकुमार लोढा यांना सन्माचिन्ह देऊन पदग्रहण सोहळा झाला. पदग्रहण सोहळ्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, राज्यपाल रमेश बैस, विविध देशाचे कॉन्सुलेट, उद्योजक, व्यापारी यांनी शुभेच्छा दिल्या. चेंबरच्या वतीने महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या हस्ते लोकसभा अध्यक्ष आणि राज्यपाल यांचा चांदीचा कलश, शाल देऊन सन्मापूर्वक सत्कार करण्यात आला.

भारत ही संत, शूरवीर योद्धे आणि समाज सुधारकांची जशी भूमी आहे, तशीच ती महान उद्योजकांची देखील भूमी आहे. वालचंद हिराचंद यांनी बिकट परिस्थितीत उद्योग उभारणीसह नवीनता व संशोधनाचे काम केले. उद्योग विकासाची दूरदृष्टी असलेल्या वालचंद हिराचंद यांचे जीवन प्रेरणादायी असल्याचे उदगार ओम बिरला यांनी याप्रसंगी काढले.

राज्यपाल रमेश बैस म्हणाले, स्वयंचलित वाहन निर्मिती, विमान निर्मिती, जहाज निर्मिती यांसह अनेक पायाभूत क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे उद्योगपती वालचंद हिराचंद यांनी पृथ्वी, जल, आकाश अश्या तिन्ही लोकात भारताचा झेंडा रोवला. देश पारतंत्र्यात असताना प्रतिकूल परिस्थितीत उद्योगविश्व निर्माण करणाऱ्या हिराचंद यांचे योगदान सुवर्णाक्षरांनी लिहावे इतके मोठे आहे. त्यांनी स्थापना केलेल्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स ने राज्याचा विकास करण्याची महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी  शेठ वालचंद हिराचंद यांच्या कार्याचा आढावा घेतला. महाराष्ट्र चेंबरच्या चौफेर प्रगतीसाठी अविरतपणे कार्यरत राहणार असल्याची ग्वाही अध्यक्ष निवडीनंतर त्यांनी दिली.

 

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते शेठ वालचंद हिराचंद यांच्या कुटुंबातील सदस्य अजित गुलाबचंद, अरविंद दोशी, चिराग दोशी, पद्मश्री सरयु दोशी, पल्लवी झा यांचा सत्कार झाला. अतिरीक्त मुख्य सचिव मनिषा म्हैसकर, महाराष्ट्र चे मुख्य पोस्ट मास्टर जनरल किशन कुमार शर्मा, कौन्सिल दि रॉयल कॉन्सुलेट जनरल ऑफ सौदी अरेबियाचे सुलेमान इद एस अल्ताइबी, कौन्सिल जनरल कॉन्सुलेट जनरल ऑफ मलेशियाचे अहमद झुआरी युसुफ, कौन्सुल जनरल ऑफ कॉन्सुलेट जनरल ऑफ बेलारूसचे अन्टॉन पशकोव्ह, चार्ज डी अफेअर्स दि कॉन्सुलेट जनरल युएई चे हमीद अलधाभाई, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे पेट्रोन मेंबर्स नितिन धूत, रमाकांत मालू, संगिता पाटील, प्रकाश शहा, मुकेश खाबणी यांचा सत्कार झाला.चेंबरचे ट्रस्ट बोर्डचे चेअरमन आशिष पेडणेकर, उपाध्यक्ष करूणाकर शेट्टी, उपाध्यक्षा शुभांगी तिरोडकर, उपाध्यक्ष रविंद माणगावे, उपाध्यक्ष तनसुख झांबड, सेक्रेटरी जनरल सागर नागरे आदींनी संयोजन केले. मानसी सोनटक्के यांनी सूत्रसंचालन केले. अरविंद दोशी यांनी आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.