पंचरत्न हरिपाठ म्हणजे हिरे, माणिक, पाचू, पुष्कराज, मोती ठेवण्याची एक छोटीशी पेटी. भागवत धर्माची स्थापना झाल्यानंतर श्री. ज्ञानदेव, श्री. एकनाथ महाराज, श्री. नामदेव महाराज, श्री. तुकाराम महाराज व श्री. निवृत्तीनाथ या पाच संतांनी ही पेटी जगासाठी उघडी करून दिली. ‘या रे या रे लहान थोर ‘ या समाजातील सर्व जाती, पंथ सर्व धर्म बांधवांसाठी खुले करून दिले. ते हे अध्यात्म ज्ञानाचे भांडार — !
वारकरी सांप्रदायिक पंचरत्न हरिपाठ या २० रु. किंमतीच्या अभंग संग्राहीकेत श्री. रंगनाथ महाराज खरात यांनी संपादीत केलेल्या पॉकेट बुक्स आकाराच्या या छोटयाशा पुस्तकात मराठी वाचकांसाठी हरिपाठाचे अभंग ते ही पाच संतांचे मिळून एकत्र केले आणि ज्ञानाची मर्मज्ञ पेटी आपणासर्वांसाठी खुली केली. ‘तुम्ही संत माय बाप कृपावंत’ म्हणून त्यांना मनोभावे दंडवत करतो.
संत एकनाथ महाराज यांनी हरिपाठाच्या १९ व्या पाठात म्हटले आहे.
परिमळ गेलिया ओस फुल देठीं ।
आयुष्या शेवटी देह तैसा ।।
सुगंध निघून गेल्यानंतर फुलाचे निर्माल्य होते. मानवी शरिराचे शेवटी निष्प्राण झाल्यानंतर तातडीने अंत्यविधी करावा लागतो. कोरोना काळात जे उपचार घेतांना मरतात देह त्याग करतात त्यांचे तर प्रेतही नातेवाईकांना दिले जात नाही ? जिवंतपणी देहात श्वास आहे तोपर्यंत या शरिराचे चलन वलन सुरु आहे. मृत्यु आल्यानंतर कितीही सुंदर देह असू दे, त्याला दफन तरी करावे लागते… अन्यथा आगीत जाळावे लागते. आता कलियुगात आणि या विज्ञान युक्त काल खंडात देहाला विद्युत दाहिनीत जाळतात हा भाग वेगळा. जीवन जगत असतांना दोन श्वासातील अंतर म्हणजे जीवन. मृत्यू हे जीवनाचे अंतिम सत्य आहे.
जो जो जीव या सृष्टीत जन्मला त्याला मृत्यू आहेच. मग तो कुणी करोडपती असेल ? त्यालाही मृत्यूला सामोरे जायचे आहे. जीवन आहे तो पर्यंत सौंदर्य, सुख, शांती, दुःख, भोग, वैराग्य, राग, लोभ, नातेवाईक, हितचिंतक, पैसा, धनसंपत्ती, मुलं, बाळं, नातु हे आहेत. एकदा का तुम्ही गेलात की हे सारे अशाश्वत नाते इथेच राहून जाते. पोटचा मुलगा असं म्हणणार नाही की, माझे बाप गेले आता मला पण जायचं आहे. ! जन्मभर साथसंगत करणारी धर्मपत्नी ती देखील पती सोबत जात नाही ? त्यासाठी मानवाने जीवन संपुष्टात येण्याआधी सावधान झाले पाहिजे शेवटचा दिवस गोड कसा होईल याचे भान ठेवून मग ‘गोविंद नाम लेकर जब प्राण तण से निकले’ त्या अवस्थेपर्यंत पोहोचायचे असेल तर भगवंताचं चिंतन सदासर्वकाळ करण्याची सवय अंगी लागली तरच हा संसार सागर तरून जाता येईल. देहाचा चंदन व्हावा असं जर वाटत असेल तर आपण ज्या समाजात जन्मलो वाढलो; त्या समाजाची निःस्वार्थ मनाने सेवा केली पाहिजे.
विवेकी सदाचारी वृत्तीने राहून संसारात परमार्थ केला पाहिजे. ‘जोडोनिया धन उत्तम व्यवहारे’ या न्यायाने धनवान व्हा पण दान धर्म करण्याकडेही कल असू द्या. परपिडा, परनिंदा, परस्त्रीकडे वाईट नजरेने पाहणेही पाप आहे ते टळले म्हणजे पहा मग हे जीवन कसे सुंदर बनते … ! हे माझे ते माझे आणि हे करतांना तुझे ते ही माझे अशा अप्रवृत्तीने जीवनाचा लवकर नाश होतो. हावरट, हापापलेली माणसं अल्पायुषी असतात मग जेव्हा अशी माणसं लवकर निघून जातात तेव्हा लोक म्हणतात ‘ बरे झाले ब्याद गेली’.
जीवन जगण्याचं शास्त्र आहे . त्यासाठी फार काही करावे लागत नाही फक्त गुरु करावा लागतो. आणि एकदाचा गुरु झाला म्हणजे जीवन परिपूर्ण झाल्याची अनुभूती आलीच समजा ..! त्यासाठी रामायण, पांडवप्रताप, हरिविजय, नवनाथ, सिद्धांतबोध, थोरा मोठ्यांची चरित्रे वाचा ग्रंथ हेच गुरु असतात. बालपणी शिव रायांना जिजाऊंनी ज्ञानोबा, तुकोबाच्या अभंगाच्या ओवी कंठस्थ करून घेतल्या. जीवन जगत असतांना आपण या भुतलावर कशासाठी आलो आहोत ? आपल्या येण्याचे प्रयोजन काय ? आपण किती लोकांच्या कामी आलो ? आपण या समाजाचे काही तरी देणे लागतो काय ? आपण काय करतोय ? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यातच काहींचे आयुष्य निघून जाते. शेवटी सर्व प्रकारची गणितं मांडून झाल्यावर उरते ती फक्त “शून्य”..! भगवंताने आपल्याला हा नरदेह दिला आहे तो किती सुंदर आहे तो काय दारू, गांज्या, चरस, अफू पिऊन उकीरडयावर झोपण्यासाठी का गटारीत झोकांडया खात पडण्यासाठी ? श्रीमंतीत सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेले काही लोक असतात ते शेवटपर्यंत हाय हाय पैसा करीत निघून जातात, याला जीवन जगणे म्हणायचे का ? नवविधा भक्तितील एकच भक्ति, चिंतन, मनन, पूजन, दास्य आदींमधून फक्त एक साधना म्हणून अंतःकरणापासून करा मग बघा जीवन कसे चैतन्याने रसरशीत होते ते … ! अहंकार, द्वेष, ईर्ष्या, राग, लोभ, दंभ या षंडरिपूंना थोडसं बाजूला ठेवा. जीवन बहारदार, डौलदार व सुवासिक होईल अशाच व्यक्तींचा शेवटचा दिवसही मग गोड होतो…
घडी घडी काळ वाट याची पाहे ।
अजून किती आहे अवकाश ।।
हाचि अनुताप घेऊन सावध होऊन काही तरी बोध घेऊन या संसारातून गेलेल्यांना सद्गती मिळते. स्वर्गात मोक्ष मिळतो.
रमेश जे. पाटील
मु.पो. आडगांव ता. चोपड़ा
जि. जळगांव (खान्देश)
९८५०९८६१००