वैद्यकीय कागदपत्रे सादर करून गिरीश महाजनांना दिले आव्हान
जळगाव ;– आ. एकनाथराव खडसे यांच्या आजारपणाबाबत शंका उपस्थित करणारे त्मंत्री गिरीश महाजन यांनी वेळ, तारीख कळवावी आणि आपले आव्हान स्वीकारावे आणि त्यांच्या आरोपामुळे आपली मानहानी झाली असून वकिलांमार्फत एक रुपया अब्रुनुकसानीची नोटीस बजावल्याची माहिती आ. एकनाथराव खडसे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांनी हॉस्पिटलच्या उपचारांची कागदपत्रे सादर केली.
आ. खडसे म्हणाले कि , मला हृदयविकाराचा झटका आला. त्यातून माझा पुनर्जन्म झाला. असे असताना मंत्री असूनही महाजनांनी बेजबाबदार वक्तव्य करणे चुकीचे असून आजार खोटा असल्याचे सिद्ध करा व मला भर चौकात जोडे मारा असे आव्हान दिले होते. मात्र आता वैद्यकीय कागदपत्रे सादर करून आ. खडसे यांनी गिरीश महाजनांनाच जोडे मारण्याबाबत आव्हान दिले आहे. तसेच त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन केलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांबद्दल त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्यांना मी घडविले, जे मला बाबा म्हणून हाक मारायचे, त्यांनी बालिशपणाने हे कृत्य केले आहे.
माझ्या प्रतिमेला जोडे मारणारे अर्ध्याहून अधिक कार्यकर्त्यांना भाजपच्या नेत्यांना दिशाभूल करून टॉवर चौकात नेण्यात आले होते. त्यांना मिटिंगसाठी बोलावण्यात आले होते. नंतर तेथून थेट टॉवर चौकात प्रतिमेला जोडे मारायला सांगण्यात आले. हे कार्यकर्ते अज्ञानी आहे. बालिश आहे. त्यांच्याविषयी मी काही बोलणार नाही, असेही ते म्हणाले.
काय म्हटलंय नोटिशीत ?
मंत्री गिरीश महाजन यांनी पूर्वी वैद्यकीय शिक्षण मंत्री म्हणून काम केलेले असल्याने त्यांना हृदयविकार आजाराबाबत माहिती नाही. महाजन हे वैद्यकीय तज्ज्ञ नसतानाही बेजबाबदार वक्तव्य करून आ. खडसे यांची बदनामी केली आहे. तसेच, मुख्यमंत्री शिंदे, वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या डॉक्टरांचाही मान ठेवलेला नाही. त्यामुळे नोटीस मिळाल्यापासून ७ दिवसात लेखी व प्रसार माध्यमांसमोर माफी मागावी. यापुढे आ. खडसे यांची बेअब्रू होईल असे वक्तव्य करू नये याची लेखी हमी द्यावी. अन्यथा फौजदारी स्वरूपाचा खटला दाखल करावा लागेल. तसेच अब्रुनुकसानीपोटी प्रतीकात्मक स्वरूपात १ रुपया नुकसान भरपाईसाठी दावा दाखल करावा लागेल असे आ. खडसे यांनी अँड. अतुल सूर्यवंशी व अँड. हरूल देवरे यांच्यामार्फेत नोटीस मंत्री महाजनांना पाठविली आहे.
तीन मंत्री पण एकही प्रकल्प नाही
जिल्ह्यात तीन मंत्री असताना एकही प्रकल्प जिल्ह्यात आला नाही. दोन वर्षापूर्वी कापसाला १२ हजार रुपये भाव होता, आता सहा हजार आहे. शेतकऱ्यांचा आत्मा जळतो आहे. संकटमोचक आहेत तर शेतकऱ्यांवरील हे संकट दूर करा. जळगावात मंजूर झालेले कृषी महाविद्यालय राधाकृष्ण विखे पाटील अहमदनगरला घेऊन गेले तर दुसरे महाविद्यालय अब्दुल सत्तार सिल्लोडला घेऊन गेले. मी मंत्री असताना बोदवड व धरणगाव तालुक्याची निर्मिती झाली. महाजन यांनी शेंदूर्णी किंवा पहूर यापैकी एक तरी तालुका निर्माण करावा, आपण त्यांचा जाहिर सत्कार करु. खासदार उन्मेश पाटील यांनी आपल्याला भाजपचे संस्कार शिकवू नये, असेही खडसे म्हणाले.