नवी दिल्ली ;- भारताचे माजी महान फिरकी गोलंदाज बिशनसिंग बेदी यांचे नुकतेच निधन झाले, त्यांच्या निधनाने भारतीय क्रिकेटसृष्टीवर शोकाकुल वातावरण असल्याने बिशनसिंग बेदी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी टीम इंडियाने हातावर काळी पट्टी बांधली आहे. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी सोशल मीडियावर माहिती देताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) लिहिले, “आयसीसी पुरुषांच्या वनडे विश्वचषक २०२३ च्या इंग्लंडविरुद्धचा सामन्यामध्ये महान खेळाडू बिशन सिंग बेदी यांच्या स्मरणार्थ भारतीय संघ हातावर काळी पट्टी बांधून उतरली आहे.”
भारताचे महान फिरकी गोलंदाज बिशन सिंग बेदी यांचे सोमवारी (२३ ऑक्टोबर) प्रदीर्घ आजाराने वयाच्या ७७ व्या वर्षी निधन झाले. बेदी यांची भारतातील सर्वोत्तम फिरकी गोलंदाजांमध्ये गणना केली जाते. त्यांनी ६७ कसोटी सामन्यांमध्ये २६६ विकेट घेतल्या आणि यातील २२ सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्वही केले. बेदी यांनी भारतासाठी १९६६ मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध कसोटी पदार्पण केले आणि १९७९ मध्ये ओव्हल येथे इंग्लंड विरुद्ध शेवटची कसोटी खेळली.