सुरगाणा, लोकशाही न्यूज नेटवर्क:
हातरुंडी येथे आपल्या आजोबांकडे सुट्टीनिमित्त आलेल्या दोन नातींचा हातरुंडी गावाजवळील दरी तलावात १५ मे रोजी साडे पाच वाजेच्या दरम्यान बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
याबाबत हातरुंडी गावचे पोलीस पाटील मधुकर गावित यांनी दिलेल्या माहितीनुसार, भावना भागवत गावित (८) रा. सुभाषनगर डोल्हारे, व रेणुका परशराम भोये वय (६) रा. सोनगीर हल्ली मुक्काम हातरुंडी या दोन्ही मुली सुट्टी निमित्ताने हातरुंडी येथे आजोबा चिमण भोये यांच्या कडे आल्या होत्या. सायंकाळी साडे पाच वाजेच्या दरम्यान आजोबा सोबत गावाजवळील दरी या तलावात रेड्यांना पाणी पाजण्यासाठी गेल्या होत्या. रेड्यांना पाणी पाजून झाल्यावर पाण्यातून बाहेर हुसकावत असतांना पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्याने दोघीजणी पाय घसरुन पडल्याने दोघींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. यापैकी भावना हि इयत्ता दुसरीत शिकत होती तर रेणुका ही बालवाडीत शिकत होती. नातेवाईकांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी हातरुंडी येथे धाव घेतली. त्यांनी मृतदेह ताब्यात घेत त्यांच्यावर राहत्या गावी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेबद्दल परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.