मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
महाराष्ट्राचे (Maharashtra) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagatsingh Koshyari) हे वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असतात.
सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) आणि छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने ते अडचणीत आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यातच आता स्वतः कोश्यारी यांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केल्याची माहिती मिळत आहे.
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील जनतेमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सावित्रीबाईंचे लहान वयात लग्न, गुजरातींचा पैसा काढून घेतला तर मुंबईत काही उतरणार नाही आणि आता छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्यामुळे राज्यपाल विरोधकांसह राज्यातील जनतेच्या निशाण्यावर आले आहेत.
विविध स्तरातून राज्यपालांना तीव्र विरोध होत असून त्यांची हकालपट्टी करण्याची भाषा करत आहे. या सर्व वादाच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी आपल्या निकटवर्तीयांकडे ही भावना व्यक्त केल्याची माहिती मीडिया रिपोर्ट्समध्ये देण्यात येत आहे. त्यांना आपल्या गृहराज्यात जाऊन पुन्हा राजकारणात सक्रीय होण्याची इच्छा असल्याची माहिती मिळत आहे.