पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क:
पाचोरा तालुक्यातील निंभोरी बु” येथे दिवाळीच्या दिवशी लहान मुले फटाके फोडत असतांना उडालेल्या ठिणगीने चारा साठवलेल्या खळ्याला आग लागल्याची घटना घडली आहे. भालचंद्र जगन्नाथ वाणी यांच्या खळ्याला पेटत्या फटाक्यांमुळे आग लागली. यामुळे दादरचा चारा, मक्याची कुट्टी जळून खाक झाली आहे.
या घटनेने भालचंद्र वाणी यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने ही आग लागल्याची बाब वेळीच लक्षात आल्याने खळ्यात ठेवलेला ५० क्विंटल कापसाचे नुकसान झाले नाही. शेजारच्या नागरिकांच्या सतर्कतेने व त्यांच्या प्रयत्नांनी पाण्याच्या बादल्या आणत व जवळच असलेली बोरींग सुरू करून आग आटोक्यात आणत पुढील होणारा मोठा अनर्थ टळला.