लोकशाही न्यूज नेटवर्क
लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले असून, भारतीय जनता पक्ष कोणत्या मतदारसंघात कोण उमेदवार द्यावा यासाठी सर्वेक्षणावर भर देत आहे. गत काळात राज्य पातळीवर सर्वेक्षण करण्यात आले होते. केंद्रीय कमिटीने राज्यातील सर्वेक्षणाची जबाबदारी हाती घेतली असून दिल्लीतील चार कंपन्यांकडे याची जबाबदारी दिली आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी कुठल्या मतदारसंघात कोण उमेदवार असावा यासाठी भाजपाने कंबर कसली असून मोठ्या प्रमाणावर सर्वेक्षण करण्यात येत आहे. मित्रपक्ष असलेल्या शिवसेना व राष्ट्रवादी यांच्यासाठीही सुरक्षित मतदारसंघ शोधले जात आहेत. लोकसभेच्या आगामी निवडणुकीत भाजप 370 जागांवर तर राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)ला 400 जागा नक्कीच मिळतील, असा विश्वास पंतप्रधान नद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. त्या दृष्टीकोनातूनच भाजपने जोरदार तयारी सुरु केली आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपाचे नेटवर्क अधिक मजबूत करण्यासाठी बुथनिहाय संपर्क अभियान राबविण्यात येत असून वरिष्ठ पदाधिकारी गावात मुक्कामाला पाठविण्यात येणार आहे. प्रत्येक विषयाचा इव्हेंट करुन जनतेसमोर जाण्यात भाजपाने आघाडी घेतली आहे.
दिल्लीच्या कंपन्यांकडे जबाबदारी
भाजपाने प्रारंभी राज्यपातळीवर सर्वेक्षण केले होते. स्थानिक पातळीवर जावून जनतेच्या अपेक्षा, आजपर्यंत झालेले काम, मोंदींची गॅरंटी, स्थानिक खासदारांचा जनसंपर्क यांचा मागोवा घेतला गेला. आता केंद्रीय कमेटीने दिल्लीस्थित चार कंपन्यांकडे जबाबदारी दिली असून त्यांच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात येत आहे.
खासदारांचे होणार मूल्यांकन!
भाजपाकडून विद्यमान खासदारांच्या कामांचे मूल्यांकन करण्यात येणार असून कुठला खासदार तत्पर असून जनतेच्या पसंतीला उतरेल याचे मूल्यांकन करण्यात येणार आहे. सोबतच शिवसेना व राष्ट्रवादी यांच्यासाठी कुठला मतदारसंघ सुरक्षित असेल याचाही शोध घेतला जात आहे.