मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
पनवेल येथे शनिवारी भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी आणि कार्यसमितीच्या बैठकीचे उद्घाटन प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी केले. त्यावेळी महाराष्ट्र प्रभारी व राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रवी, सहसरचिटणीस शिवप्रकाश, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे आणि राष्ट्रीय व प्रदेश स्तरावरील अनेक नेते बैठकीस उपस्थित होते.
केंद्रीय नेतृत्वाने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला. या कारणास्तव आपल्या सर्वाना दु:ख झाले. सलग पाच वर्षे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहिले होते. मात्र, त्यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे, असा निर्णय केंद्रीय नेतृत्वाने दिला आणि तो फडणवीस यांनी मान्य केला, असे पाटील म्हणाल़े. फडणवीस यांच्या त्यागाबद्दल सर्वानी त्यांना उभे राहून अभिवादन केले.
सरकार आज आले, पण भाजप पक्ष म्हणून मजबूत होता, आहे व राहील. पक्षाच्या नेत्यांवर श्रध्दा ठेवा. मनाचा मोठेपणा हे आपले वैशिष्टय़ आहे. मनाविरूध्द घडले तरी आपले दु:ख विसरून कामाला लागा. संघटना मजबूत करा असेही पाटील म्हणाले.