मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
निवडणूक आयोगाने शिवसेनेत वर्चस्व कोणाचे हे कागदोपत्री ८ ऑगस्टपर्यंत सिद्ध करावे, असा आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे. एकनाथ शिंदे यांनी पक्षाचे धनुष्यबाण हे चिन्ह आपल्याला मिळावे, असा अर्ज निवडणूक आयोगाकडे केला होता. त्यानुसार निवडणूक आयोगाने दोन्ही गटास शिवसेना पक्ष संघटनेतील बहुमत किंवा वर्चस्व सिद्ध करून ८ ऑगस्टला दुपारी १ वाजेपर्यंत कागदोपत्री पुरावे सादर करण्याचा आदेश देण्यात आला आहे. १९६८ च्या निवडणूक चिन्ह (राखीव आणि वाटप) नियमावलीतील १५ व्या कलमानुसार ही नोटीस देण्यात आली आहे.
राजकीय पक्षात फूट पडल्याचा दावा दोन किंवा त्यापेक्षा अधिक गटांनी केला आणि निवडणूक आयोगाची तशी खात्री झाल्यास आयोगाकडून मूळ पक्ष व फुटीर गटांना नोटीस बजाविली जाते. मूळ पक्ष व फुटीरांनी सादर केलेले दावे आणि कागदपत्रांची निवडणूक आयोगाकडून पडताळणी होते. त्यानंतर दोन्ही गटांच्या नेत्यांना सुनावणीसाठी संधी दिली जाते. या सुनावणीच्या वेळी दोन्ही गटांना आपली बाजू मांडता येते. यानंतर निवडणूक आयोगाकडून मूळ पक्ष कोणता किंवा चिन्ह कोणत्या गटाकडे जाते, याचा आदेश दिला जातो.