बापरे.. नववधू कथित भावासोबतच सैराट, झाला धक्कादायक खुलासा

0

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क

आजकाल विवाहासाठी मुलांना मुली मिळत नसल्याने पैसे देऊन लग्नासाठी मुली मिळवून देणारे रॅकेट सुरु आहे. इतकेच नाहीतर पैसे देऊन केलेली वधू विवाहाच्या अवघ्या दिवसातच पैसे आणि दागिने घेऊन फरार झाल्याच्या घटना सध्या मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. यामुळे अनेकांची मोठी फसवणूक आणि बदनामी झाल्याचे चित्र समाजात आहे. जणू काही एखाद्या सिनेमाच्या कथेला शोभेल असे एक प्रकरण उघडकीस आले आहे.

मध्यप्रदेशच्या शहापूर येथील एका तरुणाने एक लाख रुपये देऊन भुसावळमधील कंडारी येथील एका युवतीसोबत विवाह केला. मात्र विवाहाच्या दुसऱ्याच दिवशी तिने पळ काढला. तेही कथित भावासोबत. त्यांनतर कुटुंबीयांनी या दोघांना पकडून जाब विचारल्यावर धक्कादायक खुलासा झाला. आम्ही भाऊबहीण नसून पती-पत्नी आहोत असे सांगितले. याप्रकरणी त्या दोघांवर भुसावळ शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

यासंदर्भात भुसावळचे डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशच्या शहापूर येथील रहिवासी असलेले योगेश संतोष महाजन हे लग्नासाठी स्थळ शोधत होते. याविषयी त्यांनी रावेर येथील परिचित अतुल गुर्जर यांना सांगितले होते. १५ डिसेंबर २०२२ रोजी रसलपूरला गेल्यावर अतुलने त्यांना तुझ्या लग्नासाठी कंडारी (ता.भुसावळ) येथे मुलगी पाहिल्याचे सांगितले. त्यानुसार दोघे कंडारी येथे आल्यावर आशाबाई नावाच्या महिलेसोबत परिचय झाला. तिने जया सुधाकर पाटील (रा. सुभाष राेड, नाशिक) व तिचा मावसभाऊ सुनील यांच्यासोबत परिचय केला. जयाने होकार देताच आशाबाईने लग्नाच्या बदल्यात एक लाख रुपयांची मागणी केली. दरम्यान बोलणी पक्की झाल्यावर एका वकिलाकडून नोटरी करून घेत १६ डिसेंबरला जया व योगेशने लग्न लावले. साक्षीदार म्हणून आशा भगवान ठाकरे हिने स्वाक्षरी केली. यानंतर योगेशने ठरल्यानुसार आशाबाईला एक लाख रुपये दिले. विवाहावेळी याेगेश त्याचे वडील संताेष महाजन आणि त्यांचा मित्र अण्णा उपस्थित होते.

विवाहाच्या दुसऱ्या दिवशी रात्री सुनील व नंतर जयादेखील पळाले. यावेळी कुटुंबीयांनी त्यांच्याकडे विचारणा करताच तिने शौचास जाते असे सांगितले. पण, घरातच शाैचालय आहे असे सांगितल्यावर सुनील पुढे आणि जया त्याच्या मागे धावू लागली. नंतर कुटुंबीयांना त्यांना पकडून विचारणा केली असता दोघे नवरा-बायको असल्याचा धक्कादायक खुलासा झाला. यानंतर आधारकार्डच्या तपासणीवरून जयाचे खरे नाव निकिता सुधाकर साेळंके (रा.कानाेली, ता.दर्यापूर, जि.अमरावती) तर तिच्या साेबतच्या तरुणाचे नाव विठ्ठल शामराव काकडे (रा.पळशी, ता.सिल्लाेड, औरंगाबाद) असे समाेर आले.

दरम्यान दोघांना शहापूर पाेलिस ठाण्यातून भुसावळ येथे पाठवून शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यांनतर पोलिसांनी कंडारी येथून आशाबाईला चौकशीसाठी ताब्यात घेतले. अतुल गुर्जरचा शाेध सुरू आहे. तसेच या लोकांनी इतरही लोकांची फसवणूक झाली आहे का यादृष्टीने तपास सुरू आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.