जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्यात ग्रामपंचायत निवडणूक निकालांचा धुराळा उडत असतानाच जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. निवडणुकीच्या निकालानंतर दोन गटात राडा झाला असून दोन्ही गटातील कार्यकर्ते एकमेकांना भिडले. शाब्दिक वादानंतर दोन समुहांकडून परस्पर दगडफेक झाली. या रड्यात भाजपचा एक कार्यकर्ता गंभीर जखमी झाला असून दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील टाकळी येथील ग्रामपंचायतीच्या निकालानंतर विजयी मिरवणुकीत जात असताना दोन गट आपसात भिडले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी परस्परांवर दगडफेक सुरु केली. या दगडफेकीत अनेक कार्यकर्ते जखमी झाले. त्यात जखमी झालेल्या धनराज श्रीराम माळी (वय 35) या भाजप कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर जळगावात खळबळ उडाली आहे.