अकोला, लोकशाही न्यूज नेटवर्क:
अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातील चान्नी पोलीस स्टेशन हद्दीतील दिग्रस बु. इथे २७ वर्षीय एका विवाहित महिलेनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ११ ऑगस्ट रोजी दुपारी उघडकीस आली होती. सारिका विकास गवई (२७) असं मृत विवाहित महिलेचं नाव होत. मात्र आता सारिकाच्या मृतदेहाचा वैद्यकीय अहवाल पोलिसांच्या हाती आल्यावर या घटनेने वेगळच वळण घेतल आहे. आधी सारिकाचा गळा आवळून खून करण्यात आला, त्यानंतर आत्महत्याचा बनाव रचल्याचं वैद्यकीय अहवालात समोर आलं आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, पतीने पत्नीची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर तिने आत्महत्या केल्याचा बनाव रचला, असं पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. आता पोलिसांनी पतीला अटक करून तिघांविरुद्ध गुन्हे दाखल केले. पातुर तालुक्यातील दिग्रस गावातील सारिका विकास गवई या विवाहित महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. अशी माहिती तिच्या पतीने चान्नी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाढून तत्काळ घटनास्थळ मृतदेहाचा पंचनामा केला व मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात पाठविला.
या प्रकरणी चान्नी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. आता पोलिसांना वैद्यकीय तपासणीचा अहवाल प्राप्त झाला आहे. यामध्ये विवाहितेची गळा आवळून हत्या केल्याचं समोर आलं. त्यानंतर पोलिसांनी हत्येच्या दिशेनं तपास सुरू केला. तपासादरम्यान नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांना तिच्या पतीवर संशय झाला त्यानंतर पतीला ताब्यात घेतले. सद्यस्थित पोलिसांनी सैनिक पती विकास जगन्नाथ गवई, दिर सुहास जगन्नाथ गवई या दोघांना अटक केली. दोघांनाही पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. सारिका अन् विकास यांचा काही वर्षांपूर्वी विवाह झाला. लग्नानंतर काही दिवस सुरुवातीला चांगले गेले. त्यानंतर छोट्या छोट्या गोष्टीवरून नेहमी दोघांमध्ये वाद व्हायचा. चान्नी पोलिसांनी सैनिक पती विकास जगन्नाथ गवई (३६), दिर सुहास जगन्नाथ गवई (३३), सासरे जगन्नाथ दौलत गवई (६५) या तिघांविरुद्ध रात्री हत्येचा गुन्हा दाखल केला.
विकास पत्नीच्या चारित्र्यावर नेहमी संशय घ्यायचा. इतकेच नव्हे तर पत्नीही विकासच्या चारित्र्यावर संशय घ्यायची. त्यामुळे दोघांमध्ये सतत वाद व्हायचे, असं पोलीस तपासात समोर आले आहे. दरम्यान, अद्यापपर्यंत विकासने आपल्या पत्नीला मारलं नसल्याचे तो पोलिसांना सांगत आहे. तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. या शब्दांवर तो अजूनही ठाम आहे. परंतु वैद्यकीय अहवालात सारिकाची हत्या केल्याचं समोर आल्याने खळबळ उडाली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश महाजन करत आहेत.