.. तर त्यांचं निलंबन मागे घेतलं जाईल- अनिल परब

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी आणि एसटी प्रशासनातील अधिकाऱ्यांशी आज पुन्हा चर्चा केली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

सोमवारपर्यंत कर्मचारी कामावर आले तर त्यांचं निलंबन मागे घेतलं जाईल, असं सांगतानाच सोमवारपर्यंत मेस्मा न लावण्याचा तूर्तास निर्णय घेण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली.

आम्हाला कामावर यायचं आहे. पण काही लोक येऊ देत नाही असं काही कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. कामगार कामावर यायला तयार आहेत. त्यामुळे त्यांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. जे कामगार सोमवारपर्यंत कामावर येतील त्यांचं निलंबन मागे घेऊ, असं अनिल परब यांनी म्हटलं आहे.

जो डेपो 50 टक्के संख्येने सुरू होईल त्यांना तिथेच कामावर घेऊ. पण जिथे ही संख्या पूर्ण होत नाही. त्यांना बाजूच्या डेपोत सामावून घेतलं जाणार आहे. त्याबाबतचे लेखी आदेश काढणार आहोत, असं परब यांनी सांगितलं.

आतापर्यंत एसटीच्या 10 हजार कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. रोजंदारी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. तर काहींच्या बदल्या झाल्या आहेत. कोर्टाशिवाय प्रश्न सुटणार नाही हे कामगारांच्या लक्षात आलं आहे. कारवाई होईल का ही भीतीने ग्रासले आहे, असं ते म्हणालेत.

अनेक कर्मचारी गटा गटाने आमच्याशी संपर्क साधला आहे. काही कर्मचाऱ्यांनी निलंबनाच्या भीतीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. काही आत्महत्यांची कारण वेगळी असू शकतात. आत्महत्येचा प्रयत्न याचा एसटीशी संबंध जोडला जात आहे. आत्महत्या हा त्यावरचा पर्याय नाही, असं त्यांनी सांगितलं. तसेच एसटीच्या संपामुळे एसटीचे साडेपाचशे कोटींचं नुकसान झाल्याचंही त्यांनी सांगितलं.

कामगारांना अडवलं गेलं तर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार करावी किंवा डेपो मॅनेजरला सांगावं. जेणे करून त्यांना पोलीस संरक्षण पुरवले जाईल, असं सांगतानाच तूर्तास मेस्मा न लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, कामगार कामावर आले नाही तर त्याहूनही कठोर कारवाई केली जाईल, असं त्यांनी सांगितलं आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.