जळगाव, लोकशाही नेटवर्क
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने संपूर्ण महाराष्ट्रात हे प्रकरण आता चांगलेच तापले असून याबद्दल शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत जोरदार करत निषेध केला आहे.
याच पार्श्वभूमीवर जळगावात या घटेनचे तीव्र पडसाद उमटले आहे. शिवसैनिकांनी थेट भाजपच्या कार्यालयावर धडक देवून जोरदार हल्ला चढवला आहे. येथे पोलीस बंदोबस्त असल्याने शिवसैनिकांनी कार्यालयाच्या समोरच जोरदार आंदोलन केले. इतकेच नाही तर डुकरावर राणे बंधूंच्या प्रतिमा लावून त्यांना काळे फासण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करून भाजपा कार्यालयावर कोंबड्या देखील फेकण्यात आल्या. तसेच नारायण राणे यांच्या प्रतिमेला चपलांचा मार देण्यात आला. याप्रसंगी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आक्रमकतेने आंदोलन केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला.
या आक्षेपाहार्य वक्तव्याबद्दल जळगाव तसेच नाशिक, महाड आणि पुणे येथे राणेंच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर नारायण राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज रत्नागिरी न्यायलयाने फेटाळला आहे. तर राणे यांना महाड पोलिसांनी ताब्यात घेतलं असून अटक करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. नारायण राणेंच्या विरोधात कलम ५००, ५०२, ५०५, १५३ (अ) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राणेंच्या विधानानं समाजात द्वेष, तेढ निर्माण होऊ शकतो, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी आशयाची तक्रार दाखल करण्यात आली.
सोमवारी आपल्या जनआशीर्वाद दौऱ्याच्या दरम्यान महाड येथे घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरले होते. यामुळे आज राज्याचं राजकारण तापलं असून ठिकठिकाणी शिवसेनेकडून नारायण राणेंच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे.
रत्नागिरी सत्र न्यायालयाने नारायण राणेंचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर नारायण राणेंनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने तात्काळ सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. नारायण राणे यांच्या अटकेची चिन्ह असतांनाच भारतीय जनता पक्षाने विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना कोकणाकडे रवाना केलं आहे. जेणेकरुन जर नारायण राणे यांना अटक झाल्यास त्यांची जनआशीर्वाद यात्रा ही प्रवीण दरेकर पुढे चालवतील.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना आज सकाळी नाशिक मधील पोलीस पथक ताब्यात घेण्यासाठी रवाना झाले असतानाच, आज दुपारी महाड पोलिसांनी राणे यांना संगमेश्वर तालुक्यातील गोळवली येथे ताब्यात घेतले. ताब्यात घेतल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली असून, त्यांच्या आरोग्याच्या तपासणीसाठी डॉक्टरांचे एक पथक देखील दाखल झाले होते.
या प्रकरणी देवेंद्र फडणवीस म्हणाले, सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात नारायण राणे यांनी जे काही वक्तव्य केलं त्यातून एक वाद उभा राहिला. मला असं वाटतं की, बोलण्याच्या भरात नारायण राणे तसं बोलले असतील. तसं बोलण्याचं त्यांच्या मनात असेल असं मला वाटत नाही. मुख्यमंत्री हे पद फार महत्त्वाचं आहे. त्या पदाबद्दल बोलत असताना संयम बाळगणे महत्त्वाचे आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वतंत्र्याचा अमृतमहोत्सव विसरतात, यामुळे कोणाच्या मनात संताप निर्माण होऊ शकतो. त्याचा वेगळ्या प्रकारे निषेध केला जाऊ शकतो, हे सांगत असताना त्यावर सरकार ज्या पद्धतीने कारवाई करत आहे. त्याचं बिलकूल समर्थन केलं जाऊ शकत नाही. एक गोष्ट अतिशय स्पष्टपणे सांगतो की, भाजप राणे साहेबांच्या त्या वक्तव्याच्या पाठिशी नाही पण भाजप पूर्णपणे नारायण राणेंच्या पाठिशी आहे.
दरम्यान, शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहून नारायण राणेंना तात्काळ मंत्रिमंडळातून हटवण्याची मागणी केली आहे.
नारायण राणेंवर गुन्हा दाखल करण्यासाठी शिवसेनेची पोलीस स्टेशनला धाव…
भाजपा कार्यालयात शिवसेनेने सोडल्या कोंबड्या.. पोलिसांना न जुमानता शिवसैनिक आक्रमक
डुकरावर राणे बंधूंच्या प्रतिमा.. जळगावात डुकारावरून मिरवणूक काढून जाहीर निषेध
शिवसेनेने फेकलेल्या कोंबड्यांना भाजपाने दिले जीवनदान..