मुंबई : विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात काँग्रेसमध्ये मोठ्या घडामोडी घडल्या असून अशोक चव्हाण यांच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींनी मंजूर केला आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत अशोक चव्हाण यांनी आपल्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तर विधीमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांची नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून कोणत्याही क्षणी घोषणा होवू शकते असे काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले.
काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावर ठाम आहे. लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर अशोक चव्हाण यांनी स्वतःहून राजीनामा दिला होता. त्यांच्यासह काँग्रेसच्या इतर प्रदेशाध्यक्षांनीही राजीनामे दिले होते. पण अशोक चव्हाण यांचा राजीनामा अजून स्वीकारण्यात आला नव्हता. अखेर त्यांचा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींनी मंजूर केला आहे. दरम्यान, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी राजीव सातव, बाळासाहेब थोरात यांचं नाव चर्चेत होतं. पण, बाळासाहेब थोरात यांच्या नावाला पसंती मिळाली असून लवकरच याबाबची घोषणा होणार आहे. दरम्यान दिल्लीत झालेल्या अखिल भारतीय काँग्रेसच्या बैठकीत बाळासाहेब थोरात यांच्या नावावर सहमती झाली.