खोटे बोलून मते घेणे काँग्रेसचा धंदा!

नंदुरबारमधील सभेत मोदींचा हल्लाबोल : विकासाला मते देण्याचे आवाहन

0

नंदुरबार-
बारामतीमध्ये झालेल्या मतदानानंतर शरद पवार हे चिंतेत असल्याचे दिसून येत आहेत. त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांशी चर्चा करूनच काँग्रेसमध्ये विलीन होण्याचे मन बनवले असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. मला वाटते चार जूनच्या निकालानंतर नकली राष्ट्रवादी आणि नकली शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन करणार असल्याचा दावा नरेंद्र मोदी यांनी केला आहे. त्यापेक्षा अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत या आणि आपले स्वप्न पूर्ण करा, असे आवाहन देखील नरेंद्र मोदी यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना केले आहे. डॉ. हीना गावित यांच्या प्रचारासाठी नंदुरबार येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते. खोटे बोलून मते घेणे हा काँग्रेसचा धंदा झाला आहे, असा हल्लाबोलही त्यांनी यावेळी केला.
यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री अनिल पाटील, डॉ. विजयकुमार गावित, आमदार अमरीशभार्इ पटेल, उमेदवार डॉ. हिना गावित यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
काँग्रेसने खोट्याची कंपनी उभारली आहे. ते कधी आरक्षणासाठी खोटे बोलतात तर कधी संविधानासाठी खोटे बोलतात. आरक्षणावर काँग्रेस सध्या ‘चोर मचाये शोर’ असे दिसत असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. धर्माच्या आधारावर आरक्षण हे बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील नाकारले होते. त्यामुळे हे आरक्षण त्यांच्या विचारांच्या विरोधात असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. अशा पद्धतीने आरक्षण देणे म्हणजे संविधान निर्मात्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्यासारखे आहे. हे पाप कधीही माफ होणार नाही, असा आरोप देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. वंचित, गरीब आणि आदिवासी लोकांचे आरक्षण काढून घेऊन ते त्यांच्या व्होटबँकेला देण्याचा डाव असल्याचा आरोप देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.

‘वंचितचा जो अधिकार, मोदी त्याचा चौकीदार’
कर्नाटकमध्ये काँग्रेसने ओबीसी समाजाचे आरक्षण काढून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या सरकारने एका रात्रीत कर्नाटकमध्ये मुस्लिम समाजाला ओबीसीचा दर्जा दिला. त्यामुळे ओबीसी समाजाच्या आरक्षणात वाटेकरी वाढले आहे. मात्र, जो पर्यंत मोदी जिवंत आहे, तो पर्यंत कोणाच्याही आरक्षणाला धक्का लागू देणार नसल्याचे मोदी यांनी म्हटले आहे. ‘वंचितचा जो अधिकार, मोदी त्याचा चौकीदार’ असे म्हणत नरेंद्र मोदी यांनी आरक्षणाच्या मुद्यावर काँग्रेसला घेरण्याचा प्रयत्न केला.

चौधरींचा चहा आणि मोदींनी काढली आठवण
नंदुरबार आणि गुजरात यांचा खूप जवळचा संबंध आहे. पंतप्रधान होण्याआधी देखील मी अनेकदा नंदुरबार येथे येत होतो. नंदुरबारला आलो आणि चौधरींचा चहा घेतली नाही, असे कधीच होत नाही. तुमचा चहा आणि तुम्ही सर्वांनी दिलेल्या प्रेमाचे कर्ज हा नरेंद्र मोदी कधीही विसरू शकत नसल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. वंचित आणि आदिवासी जनतेची सेवा ही माझ्यासाठी परिवारातील सदस्यांच्या सेवेप्रमाणे असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे. काँग्रेसच्या शाही परिवाराप्रमाणे मी मोठ्या घरातून आलेलो नाही. मी तर गरीबी पाहिले आहे. असे देखील नरेंद्र मोदी यांनी यावेळी म्हटले आहे.

आदिवासींना घर देण्याचा संकल्प
आदिवासी समाजातील महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. अनेकांना पक्के घर मिळाले नव्हते, इतकेच नाही तर साठ वर्षांच्या कार्यकाळात वीज देखील नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचली नव्हती. त्यामुळे प्रत्येक गरिबाला आणि आदिवासींना घर देण्याचा संकल्प आम्ही केला आहे. प्रत्येक आदिवासी समाजाला पाणी देण्याचा संकल्प आम्ही केला होता. जंगलात राहणाऱ्या आदिवासी समाजातील गावात देखील वीज पोहोचवण्याचे काम आमच्या सरकारने केला असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

तीन कोटी घर बांधणार
ज्या नागरिकांना अद्याप घर मिळाले नाही. ज्या नागरिकांना अद्याप नळाला पाणी मिळाले नाही. ज्या नागरिकांना अद्याप गॅस कनेक्शन मिळाले नाही. त्या नागरिकांना सांगा की, पुढच्या टर्म मध्ये त्यांना घर, गॅस कनेक्शन, वीज आणि पाणीपुरवठा नरेंद्र मोदी देणार ही गॅरंटी आहे, असे आवाहन नरेंद्र मोदी यांनी उपस्थित मतदारांना केले. तिसऱ्या कार्यकाळामध्ये आपण तीन कोटी घर बांधणार असल्याचा दावा देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.